कोल्हापूर (प्रतिनिधी) – मराठा आरक्षणासाठी कोल्हापूरात आयोजित केलेल्या न्यायिक परिषदेला सुरुवात झाली आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून या परिषदेला सुरुवात झाली आहे.
या परिषदेला ऍड. श्रीराम पिंगळे, ऍड. आशिष गायकवाड, नाबार्डचे माजी अध्यक्ष यशवंत थोरात, प्रा. जयंत पाटील, ऍड.रणजित गावडे, जयेश कदम, दिलीप पाटील, दिलीप देसाई हे सर्व उपस्थित राहिले असून. थोड्याच वेळात खासदार संभाजीराजे छत्रपती सुद्धा उपस्थित राहणार आहेत.
या परिषदेत कोल्हापूर सह सांगली, सातारा, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 5 जिल्ह्यातील वकिल सुद्धा उपस्थित राहिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीला स्थगिती दिल्यानंतर त्याचे संतप्त पडसाद कोल्हापूरसह संपूर्ण महाराष्ट्रात उमटले आहेत.
मात्र गेल्या अनेक वर्षांपासून रस्त्यावरची लढाई तर केलीच आता न्यायालयीन लढाईसाठी अधिक बळकट होण्याची गरज असून त्यासाठीच आज कोल्हापूरात न्यायिक परिषद पार पडत आहे. मराठा आरक्षणाच्या या लढ्याचे केंद्र आता कोल्हापूर झाले आहे. कोल्हापुरातून या आरक्षणाच्या प्रश्नावर संपूर्ण महाराष्ट्रात आवाज उठवण्यासाठी व न्यायिक विचारविनिमय करण्यासाठी मराठा क्रांति मोर्चा, सकल मराठा समाजाच्या वतीने आज न्यायिक परिषद पार पडत आहे.