नवी दिल्ली- सर्व दबाव आणि शक्यतांचा सामना करत सर्वच न्यायाधिशांनी निर्भयपणे न्यायदान करावे. न्यायपालिकेची सर्वात मोठी ताकद म्हणजे तेथील लोकांचा विश्वास असल्याने न्यायाधीशांनी त्यांच्या तत्त्वांना धरुन दृढ राहायला हवे आणि त्यांच्या निर्णयाबाबत ठाम राहणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ न्यायाधीश एन. व्ही. रमणा यांनी केले आहे.
सुप्रीम कोर्टाचे सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश ए. आर. लक्ष्मणन यांचे 27 ऑगस्ट रोजी निधन झाले. त्यांच्या शोकसभेत बोलताना न्या. रमणा बोलत होते. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय. एस. जगन मोहन रेड्डी यांनी आपल्यावर मुख्य न्यायाधीश एस. ए. बोबडे यांना लिहिलेल्या पत्रात त्यांच्यावर आरोप केल्याबद्दल नुकत्याच झालेल्या अभूतपूर्व वादाच्या पार्श्वभूमीवर रमणा यांच्या या टिप्पणीला महत्त्व आहे.
न्या रमणा पुढे म्हणाले की, खास करुन न्यायाधीशांनी त्यांच्या तत्त्वांना धरुन दृढ निश्चय केला पाहिजे आणि निर्णय देताना निर्भय असले पाहिजे. सर्वच न्यायालयांतील न्यायाधीशांनी सर्व दबाव आणि प्रतिकारांचा सामना करत सर्व अडथळ्यांविरूद्ध धैर्याने उभे राहणे, आजच्या काळात महत्त्वाचे आहे, असे ते म्हणाले.
आमची मूल्ये ही आमची सर्वात मोठी संपत्ती आहे आणि आपण ती कधीही विसरू नये. न्या. लक्ष्मणन यांनी आपली मूल्ये आपल्या जीवनात प्राणपणाने जपली आणि एक चांगला माणूस आणि न्यायाधीश होण्यासाठी त्यांनी अनेकदा त्याग केला, याकडे लक्ष वेधून न्या रमणा म्हणाले की, जर कोणत्याही न्यायाधिशाला निर्भयपणे न्यायदान करता येत नसेल, तर ते लोकशाहीला मारक ठरु शकते.