नगर – जिल्ह्याच्या विकासात पत्रकारांचे मोठे योगदन आहे. निळवंडे व कुकडी धरणांसाठी पत्रकारांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. पत्रकारांनी ही विकासाची परंपरा जपावी. पत्रकारीतेत स्पर्धा असू द्या. मात्र द्वेश नको, असे प्रतिपादन ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनी केले.
गडाख यांना प्रेसक्लबच्यावतीने पत्रकार दिनानिमित्त जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, राजकारण करताना ध्येय्य, उद्दिष्ट असावे लागते. आम्ही राजकारण करताना विकासाची भूमिका ठेवली. त्यामुळे साखर कारखाने, शैक्षणिक संस्थांसह विविध संस्था ग्रामीण भागात निर्माण केल्या. त्यातून अनेकांना रोजगार मिळाला.
मात्र आजच्या नेत्यांना राजकारण ही खुर्चीकडे जाणारी फुलांची वाट आहे, असे वाटते. मात्र गुलाबाच्या फुलांना काटेही असतात. याची जाणीव त्यांनी ठेवावी.
सध्या राजकारणात ध्येय्य नसलेली माणसे वाढली आहेत. त्यामुळे मनी, मसलचा वापरही वाढला आहे. त्यामुळे राजकारण्यांची प्रतिमा खालावली आहे. तसेच राजकारणही दूषित झाले आहे. राजकारणातील नवीन पिढीने आता विकासाचा ध्यास घेऊन नवनिर्मितीची तयारी ठेवण्याची गरज आहे. तसेच सर्वांना बरोबर घेऊन पुढे जाण्याची गरज आहे. चांगल्या कामांना पत्रकारांनीही प्रोत्साहन देण्याची गरज आहे. पत्रकारीतेतील बदलत्या व्यवस्थेवरही त्यांनी प्रकाश टाकला.