कोपरगावच्या पत्रकार जावायाचा उपचारा अभावी मृत्यू
कोपरगाव (प्रतिनिधी) : खाजगी रुग्णालयांची मुजोरी, शासकीय आरोग्य यंत्रणेच्या सुविधांच्या अभावामुळे कोपरगावचे पत्रकार जावाई पांडुरंग रायकर (वय ४२) यांचा बळी गेल्याची चर्चा तालुक्यात जोरदार सुरू झाली.
टीव्ही ९ या वृत्तवाहिनीचे पुणे येथील प्रतिनिधी व कोपरगाव शहरातील अंबिकानगर येथील जावई पांडूरंग रायकर हे ५ दिवसापुर्वी पत्नी व दोन लहान मुलांना भेटण्यासाठी आले होते. सोमवारी त्यांना श्वसनासह इतर शारिरीक त्रास जाणवू लागल्याने कोपरगाव कोव्हीड सेंटर येथे तपासणी केली असता त्यांना करोनाची लागण झाल्याचे सांगण्यात आले.
तेथून त्यांना कोपरगावच्या आत्मा मालीक खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यासाठी गेले असता तेथे उपचारापुर्वीच ४० हजार रूपये रोख आनामत रक्कम भरण्याचा आग्रह रुग्णालयाच्या व्यवस्थापनाने धरला. मात्र, रोख पैसे नसल्याने आणि एटीएम कार्ड स्वॅप करण्याची सुविधा नसल्याने पैसे भरता आले नाही. त्यामुळे रायकर यांचे नातेवाईक व मित्र परिवार यांनी व्यवस्थापनाकडे अनंत विनवण्या केल्या. तहसीलदारा पासुन जिल्हाधिकारी यांच्यापर्यंत चर्चा व वादविवाद केल्या नंतर पांडूरंग रायकर यांच्यावर एकदिड तासानंतर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करून घेतले. मात्र उपचारा अभावी ताटकळत राहील्याने पांडूरंग रायकर यांची प्रकृती अधिकच खालावली.
उपचारा सुरू केला पण समाधानकारक न वाटल्याने रायकर यांना संजीवनी महाविद्यालयाच्या आत्याधुनिक रुग्णवाहिकेतून तातडीने पुणे येथे उपचारासाठी एका खाजगी रुग्णालयात दाखल केले पण तेथेही अपेक्षित उपचार होत नसल्याने पुढे घेवून जाण्यासाठी त्या रुग्णालयाकडे सर्व सुविधानियुक्त रुग्ण वाहिका न मिळाल्याने अखेर योग्य उपचारा अभावी रायकर यांचा दुर्दैवाने मृत्यु झाला. रायकर यांचा करोना पेक्षा व्यवस्थेने बळी गेला असे म्हणण्याची वेळ पत्रकारावर आली आहे.
दरम्यान, पांडूरंग रायकर हे श्रीगोंदा तालुक्यातील असुन त्यांच्या पाश्चात्य आई, वडील, बहीण,पत्नी दोन छोटी मुलं आहेत. रायकर यांच्या मृत्युने संपूर्ण पत्रकारामधून संतापाची लाट उसळली आहे. स्वताःचा जीव धोक्यात घालून इतरांच्या समस्या पोटतिडकीने मांडणाऱ्या पत्रकारांच्या बाबतीत शासकीय यंत्रणा किती उदासिन आहे. हे, या बळी गेलेल्या पत्रकाराच्या घटनेवरून सिध्द होत आहे. रायकर यांच्या मृत्यु नंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.