ओंकार दळवी
जामखेड – आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या भगव्या स्वराज्य ध्वजाने लहानथोरांपासून सर्वांनाच भारून टाकले आहे. खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या स्वराज्य ध्वजाचे कौतूक केले.सध्या शिवरायांच्या स्वराज्य धर्माच्या शिकवण आणि महाराष्ट्राच्या शौर्यशाली इतिहासाची सर्वांना आठवण करून देण्यासाठी स्वराज्य ध्वज मोहिम राज्यातील सर्व जिल्ह्यांमधून तसेच इतर सहा राज्यांतून फिरते आहे.
या प्रेरणादायी मंगल ध्वजाला अभिवादन करण्यासाठी ठिकठिकाणी गर्दी होते. स्वराज्य ध्वजाने अशा प्रकारे सर्वांनाच प्रोत्साहित केले असतानाच आता ध्वजाच्या सोबतीला एक अत्यंत जोशपूर्ण स्वराज्य ध्वज गीत देखील प्रसिद्ध करण्यात आले आहे. या गीताची संकल्पना देखील रोहित पवार यांची आहे. सर्व सामाजिक प्रसारमाध्यमांवर हे गीत प्रसिद्ध करण्यात आले असून अगदी काही तासातच या स्वराज्य ध्वज गीताने राज्यातील तमाम युवावर्गाला भुरळ घातलीय.
मातीत रूजला…गगनात सजला..नभी पसरला हा रंग.. अशा दमदार शब्दरचनेला स्वर दिला आहे. अवधूत गांधी ताल, संगीत दिग्दर्शन श्रेयस नंदा देशपांडे यांनी केले. पुण्याच्या पुणे स्टुडिओमध्ये चित्रित झालेल्या गाण्याची कोरिओग्राफी अभिषेक हवारगी आणि विक्की माने यांची आहे. व्हिडिओचे दिग्दर्शन आदित्य राठी यांनी केले आहे तर संकलन गायत्री पाटील यांनी केले आहे. स्वाभिमानाचं, एकतेचं आणि महाराष्ट्राच्या परंपरेचं प्रतिक असणाऱ्या या भगव्या स्वराज्य ध्वजाच्या निमित्ताने आमदार रोहित पवार यांनी महाराष्ट्राची नवी निश्चयी करारी ओळख देशासमोर आणण्याचा संकल्प केला आहे.
हे नवे वीररसापूर्ण स्वराज्य ध्वजगीत महाराष्ट्राचा अभिमानास्पद इतिहास देशापुढे नेण्यासाठी निश्चितच मोठे योगदान देईल, असा विश्वास रोहित पवार यांनी व्यक्त केला.दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर 15 ऑक्टोबर रोजी खर्ड्याच्या शिवपट्टण किल्ल्यावर या स्वराज्य ध्वजाची प्रतिष्ठापना होणार आहे.
त्या निमित्ताने या स्वराज्य ध्वजगीताची निर्मिती करण्यात आली आहे. सर्व जातीधर्मांच्या लोकांसाठीचा हा वैशिष्टयपूर्ण 74 मीटर उंच भगवा ध्वज महाराष्ट्रातील हिंदवी स्वराज्याच्या वैभवशाली इतिहासाची माहिती सर्वदूर पोहोचवण्यासाठी करोना साथी संबंधित सर्व सामाजिक नियमांचे पालन करत 37 दिवस प्रवास करणार आहे अशी माहिती स्वराज्य ध्वजाचे संकल्पनाकार आमदार रोहित पवार यांनी दिली. सध्या खर्डा किल्ल्यावर ध्वज उभारण्याची जोरदार तयारी सुरू आहे.
तब्बल 74 मीटर उंचीचा ध्वज
या स्वराज्य ध्वजाचे वैशिष्ट्य म्हणजे हा झेंडा 74 मीटर उंचीचा असणार आहे. तब्बल 18 टन वजन असलेल्या खांबावर 90 किलो वजनाचा आणि 9664 फूट आकाराचा भव्य-दिव्य स्वराज्य ध्वज आकाशाला गवसणी घालणारा ठरणार आहे. याची उंची तब्बल 74 मीटर इतकी असणार आहे.खर्ड्याच्या किल्ल्यावर फडकवण्यात येणारा स्वराज्य ध्वज देशातील किंबहुना देशातील सर्वांत उंचावर 15 ऑक्टोबर रोजी हा ध्वज फडकवण्यात येणार आहे.