प्रसाद शेटे
आमदारांच्या पक्षांतराबाबत जावळी तालुक्यात चर्चा
मेढा – लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसने आपला बालेकिल्ला शाबूत ठेवत आपली बुरुजबांधणी केली असली तरी राष्ट्रवादीला मिळालेल्या मतांनुसार आगामी विधानसभेच्या निकाल आश्चर्यकारक लागणार असा अंदाज व्यक्त होत आहे. राष्ट्रवादीचा अभेद्य बुरुज समजला जाणारा सातारा जावळी मतदारसंघ परिवर्तनाच्या दिशेने वाटचाल करणार की आमदारच पक्षांतर करणार हा प्रश्न मतदारांना तसेच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना पड़त आहे. सातारा जावळीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे भाजप नेत्यांच्या भेटीमुळे राष्ट्रवादीच्या गटात घालमेल होत असून भाजप प्रवेशाबाबत दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे.
लोकसभेनंतर विधानसभेच्या रणधुमाळीसाठी प्रत्येक आमदाराला आपापला बुरूज शाबूत ठेवण्याचे काम करावे लागणार आहे. कारण लोकसभेपूर्वीपासूनच भाजपमधील काही इच्छुकांनी बांधणी सुरू केली आहे. ही बांधणी करताना त्यांना भाजपच्या बूथनिहाय बांधणीचा फायदा होणार आहे. त्यामुळे बालेकिल्ला असूनही राष्ट्रवादीच्या आमदारांना सावध राहूनच वाटचाल करावी लागेल. मतदारराजा कोणाला धक्का देईल, हे सांगता येत नाही. त्यामुळे राष्ट्रवादीच्या आमदारांनी विधानसभेसाठी बालेकिल्ल्याच्या बुरूजांची बांधणी करण्याचा निर्णय घेतला आहे की काय, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. विधानसभा मतदारसंघात प्रत्येक गावागावांत जाऊन राष्ट्रवादी पक्षाविषयी मतदारांत विश्वास निर्माण करण्याचे काम होणार असले तरी सध्या राष्ट्रवादीचे आमदार सक्षम आणि पुन्हा निवडून येण्यासारखी परिस्थिती असली तरी विरोधकांबाबत गाफील राहून वाटचाल करणे सध्याच्या परिस्थितीत सोपे नाही.
यावेळेस भाजपकडून सर्व अस्त्रे वापरली जाऊन राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला सुरूंग लावण्याचे काम होणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला वरवर सोपे वाटत असले तरी आतून भाजप, शिवसेना बालेकिल्ला पोखरत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे प्रत्येक विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला संपर्क अभियान राबवून प्रत्येक मतदाराला विश्वास द्यावा लागणार आहे. अन्यथा हाच मतदार लोकसभेप्रमाणे विधानसभेतही मोदी आणि फडणवीस लाटेत वाहून जाऊ शकतो. त्यामुळे राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांना आता सावध वाटचाल करत विधानसभेसाठी तळागाळातून बांधणी करण्यास सुरवात करायला लागणार आहे.