मुंबई – महाराष्ट्रातील आगळावेगळा प्रयोग ठरलेल्या महाविकास विकास आघाडीतील कुरबूर दिवसेंदिवस वाढत चालल्याचं चित्र आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसवर कडाडून टीका केली होती. आता पटोले यांनी शिवसेनेवर देखील जोरदार हल्लाबोल केला .
पंजाबमधील सुनील जाखड आणि गुजरातमधील हार्दिक पटेल यांनी नुकतीच काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली. हाच धागा पकडून शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’ दैनिकात काँग्रेस नेतृत्वाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत टीका करणारा आग्रलेख लिहिण्यात आला.
शिवसेनेकडून झालेल्या या टीकेला नाना पटोले यांनी नाराजी व्यक्त करत चोख प्रत्युत्तर दिलं आहे. “ज्यांना बलिदानाची पार्श्वभूमी नाही त्यांना काँग्रेस काय कळणार?” असा सवाल नाना पटोले यांनी केला आहे.
पटोले पुढं म्हणाले की, “काँग्रेस एक विचार आहे. विचार कधीही संपत नाही. देशाचा स्वातंत्र्यलढा असो किंवा देशाचे महासत्ता बनवण्यासाठीचे प्रयत्न, यामध्ये काँग्रेसने नेहमीच स्वत:ला झोकून दिले आहे. राजीव गांधी यांनी देशासाठी बलिदान दिले आणि आजच्याच दिवशी काही लोक आमच्यावर टीका करत असल्याची खतं पटोले यांनी व्यक्त केली.
दरम्यान केंद्रातल्या भाजप सरकारमुळे बेरोजगारीचा प्रश्न गंभीर झाला आहे. सरकारी मालमत्ता विकली जात आहे. या गोष्टींवर अग्रलेख लिहायची गरज असल्याचा टोलाही पटोले यांनी शिवसेनेला लगावला.