पुणे -महापालिकेत गाव समाविष्ट झाले तर नोकरी कायमस्वरुपी होईल, असे आमिष दाखवून वर्षभरात या गावांत मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांची भरती झाली. मात्र, निकष निश्चित करून जे पात्र असतील त्यांचीच नोकरी कायम करणार असल्याचे महापालिका अधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
त्यामुळे या मागील वर्षभरात ज्या गावांमध्ये बोगस भरती केली असेल त्या कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात आहे.हद्दीलगतची 23 गावे पालिकेमध्ये समाविष्ट करण्याचा मसुदा डिसेंबर 2020 मध्ये प्रसिद्ध करण्यात आला.
त्यानंतर काही ग्रामपंचायतींनी कर्मचाऱ्यांची भरती केली. यात काही ग्रामपंचायतींनी करोनाचे कारण दाखवत, तर काहींनी मनुष्यबळाची कमतरता असल्याने सांगत भरती केली. ही प्रक्रिया करताना जाहिरात प्रसिद्ध केली नाही.
काही सदस्य व ग्रामसेवकांनी मर्जीतील माणसांची नियुक्ती केली. त्यामध्ये शिक्षण व त्यापदासाठी पात्रता सुद्धा विचारात घेतली नाही. मांजरी बुद्रक या गावामध्ये 33 जणांची भरती केली होती.
यासंदर्भात तक्रारी आल्यानंतर जिल्हा परिषदेने ही भरती रद्द केली. मुळशीतील दोन ग्रामपंचायतींमध्ये एकूण 50 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांची बोगस भरती केल्याची चर्चा सुरू आहे. भरती करताना कॅश व्हाऊचरवर पगार दाखविण्यात आले.
मागील तारखेचा ग्रामसभेचा ठराव करत भरती दाखविण्यात आली. हे जुने कर्मचारी आहेत, हे दाखविण्यासाठी रेकॉर्डसुद्धा तयार केले. ग्रामसेवक, पंचायत समितीमधील वरिष्ठ अधिकारी, सरपंच अशा सर्वांच्या संगमताने ही बोगस भरती केल्याची चर्चा आहे.
ग्रा.पं., जि. प.डून प्राप्त रेकॉर्ड तपासणी
महापालिकेच्या हद्दीत 2017 मध्ये 11 गावे समाविष्ट केल्यानंतर ग्रामपंचायतीमध्ये बोगस भरती झाल्याचे निदर्शनास आले होते. महापालिकेने त्यामध्ये सुमारे 136 कर्मचाऱ्यांना सेवेत समावून घेतले नाही. आता 23 गावांतील ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषदेकडून सर्व रेकॉर्ड प्राप्त झाल्यानंतर त्याची तपासणी केली जाईल. महापालिका प्रशासन कर्मचाऱ्यांना नोकरीमध्ये सामावून घेताना निकष ठरविणार आहेत. त्या निकषांमध्ये पात्र ठरणाऱ्यांनाच नोकरीत कायम केले जाणार आहे.