मुंबई – राज्यात ऑगस्ट महिन्यात सरकारच्या कौशल्य विकास मंत्रालयातर्फे 17 हजार 372 जणांना रोजगार देण्यात आला आहे अशी महिती या विभागाचे मंत्री नवाब मलिक यांनी आज दिली. या विभागातर्फे महास्वयं पोर्टल, ऑनलाईन रोजगार मेळावे अशा उपक्रमांमधून गरजुंना रोजगार पुरवला जात आहे.
त्यासाठी विविध औद्योगिक कंपन्या, सेवा उद्योगातील कंपन्या तसेच अन्य सरकारी उपक्रमांशी संपर्क साधून रोजगार दिला जात आहे. राज्य सरकारचा उद्योजकता विभाग आणि कौशल्य विकास विभाग यांच्या मार्फत प्रयत्न केले जात आहेत अशी माहितीही नवाब मलिक यांनी दिली.
या मंत्रालयातर्फे सन 2020 या साली राज्यातील तब्बल दोन लाख लोकांना नोकऱ्या दिल्या गेल्या होत्या. हाच प्रयत्न याही वर्षी सुरू असून त्यातही अनेकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत असे ते म्हणाले. महास्वयं वेबपोर्टलवर उद्योग क्षेत्रातील कंपन्या आपली नाव नोंदणी करू शकतात. त्याद्वारे त्यांना कुशल कामगार तेथेच मिळण्याची सोय करून देण्यात आली आहे.
म्हणजेच रोजगार देणारे आणि रोजगार मागणारे यांच्यासाठी हे संयुक्त व्यासपीठ दोघांनाही उपयुक्त ठरत आहे. या वेबपोर्टलवर खासगी व सरकारी उद्योगातील सुमारे 99 हजार कंपन्यांनी नोंदणी केली आहे. त्यांना वेळोवेळी जशी कामगारांची गरज असते ते कामगार त्यांना येथून उपलब्ध होऊ शकतात.