आजच्या गतिमान, आधुनिक आणि स्पर्धेच्या युगात अन्न, वस्त्र आणि निवारा ह्या किमान प्राथमिक गरजांचा विचार करून फक्त चालत नाही, तर बदलत चाललेल्या जीवनमूल्यांचाही स्वीकार करावा लागतो. आज आपल्या आयुष्यातील प्रत्येक सुखात आणि दुःखात आपल्याला शारीरिकदृष्ट्या साथ-सोबत करणारं, मानसिक आधार देणारं, अंतर्मनाला धीर देणारं, आर्थिकदृष्ट्या सक्षमता देऊ करणारं, सामजिक पत निर्माण करणारं, शैक्षणिक प्रगतीची दिशा दाखवणारं, कौटुंबिक एकोपा टिकवणारं, आपली नातीगोती जपणारं, उणिवा दूर करणारं, आपल्या जाणिवा जपणारं, आपल्या जाणिवांना नेणिवेपर्यंत घेऊन जाणारं, आपल्या जीवनात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणारं आपलं हक्काचं साधन हे दुसरं-तिसरं कोणतंही नसून ते म्हणजे आपलं करिअर अर्थात अर्थार्जनासाठी निवडलेला आपल्या आवडीचा पर्याय, मार्ग.
आपलं करिअर ह्या शब्दांमधूनच आपल्या स्वतःच्या भाव-भावना प्रकट होत असतात. आपल्याला अंतर्मनातून असलेली अर्थार्जनाची ओढ आणि त्यामुळेच निर्माण झालेलं करिअरबरोबरचं आपलं नातं अतूट असतं. आपल्या मनात आपलं करीअर हे घर करून राहिलेलं असतं. ही घरघर प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य घटक असल्याप्रमाणे अनुभवली जात असते. पै पै जमवलेली जमापुंजी आपल्या स्वतःसाठी अथवा घरासाठी वापरताना आणि मुख्य म्हणजे ती मिळवताना तसंच जमवताना अनुभवलेल्या प्रत्येक क्षणाची आठवण आपल्याला झाल्याशिवाय राहात नाही. आपलं प्रत्येक स्वप्न साकार होताना आपल्याला मिळणारा आनंद निश्चितच निराळा असतो, पण ही स्वप्नं साकारण्यासाठी आपल्या करिअरची यथायोग्य निवड करणंही तितकेच जरुरीचं असतं.
अर्थ सार्थ करणारं करिअर
आपल्या हातात अर्थ असेल, तर आणि तरच आपलं जीवन समर्थ आहे आणि तरच आयुष्याला अर्थ आहे. अशी सद्य:स्थिती असल्याचं आपण प्रत्येकजण अनुभवत आहोत. अर्थात पैसा कमवणे आणि जमवणे हे तो गमावण्यापेक्षा अधिक कष्टप्रद असतं. आपण मिळवलेला पैसा कमवायला आणि जमवायला जो वेळ लागतो त्याच्या तुलनेनं गमवायला काहीच वेळ लागत नाही. गमवलेला पैसा परत मिळवता येऊ शकेलही परंतु तो कमवण्यासाठी गमवलेला वेळ मात्र परत मिळवता येत नाही, ह्याचं भान आपण सर्वप्रथम ठेवणं आवश्यक असतं. अनेकदा आपण करायला गेलो एक आणि झालं भलतंच, असा अनुभव एखाद्याच्या आयुष्यात कधी ना कधी येऊ शकतो. ह्या अनुषंगाने अनेक शैक्षणिक संस्था संबंधितांना करिअर तसंच मानसशास्त्रीय बाबींचा अभ्यासपूर्वक विचार करून समुपदेशनाची व्यवस्था करतात. अशावेळी केवळ आपली शैक्षणिक संस्थांच आपल्या उपयोगी पडते. करिअर निवडीत आपल्या गरजांच्या अनुसरून अर्थार्जन किती होऊ शकतं? हे ठरत असतं. आर्थिक स्थिरता देणारं करिअर निवडणं जसं जरुरीचं असतं तसंच आत्मिक आनंद देणारं देखील ते असावं लागतं. ह्या करिअर करण्याच्या नादात आपली फसगत तर होत नाही ना? ह्याची सतत जाणीव ठेवणं सद्यःस्थितीमध्ये अत्यंत आवश्यक आहे.
करिअर निवडीत चिकित्सा महत्त्वाची
आपल्यापैकी नोकरी व्यवसाय करणाऱ्या तसेच न करणाऱ्या प्रत्येकानं करिअर निवडीच्या महत्त्वपूर्ण बाबी समजूत घेतल्या पाहिजेत. आपण निवडलेल्या करिअरचा केवळ गरजेपुरता आणि अर्थार्जनासाठी उपयोग करून चालणार नाही, तर करिअरमध्ये स्थिरता आणि आत्मिक आंनद मिळवण्याचे तंत्र अवगत करता आलं पाहिजे. ह्यासाठी आपण प्रत्येक बाबतीत चिकित्सा केली पाहिजे. करिअरची निवड करण्यापूर्वी आपल्या गरजांची योग्यता, त्यांची आपण करत असलेली अपेक्षा आणि त्यांची पूर्तता ह्या सर्वच बाबींचा आपण अभ्यासपूर्वक विचार केला पाहिजे. आपल्या गरजांची पूर्तता करणारं करिअर निवडण्याचा अनेकांचा कल असतो, अर्थात ते स्वाभाविकच असतं; परंतु ह्या व्यतिरिक्त निराळं तंत्र आपण आत्मसात करून चांगल्याप्रकारे केलेली करिअरची निवड अधिक आनंददायी ठरू शकते.
आपल्या सर्वांच्या जीवनात अत्यंत महत्त्वाचा आणि जिव्हाळ्याचा विषय म्हणजे आपलं करिअर. ह्या करिअरचा थेट संबंध आपल्या भाव-भावनांशी अर्थात आपल्या आवडीशी असतो. हे अनेक शैक्षणिक संस्थांनी चांगलं ओळखलं आहे. त्यानुसार वैविध्यपूर्ण शिक्षणाचा जणू वसाच ह्या संस्थांनी घेतला आहे. अनेक संस्थांनी पारंपरिक अभ्यासक्रमाला बगल देऊन कौशल्य आधारित शिक्षण प्रारंभापासून द्यायला सुरुवात केली आहे. परंतु असं जरी असलं तरीही, काही ठिकाणी मात्र नोकरीचा धंदा सुरू केल्याचंही खेदजनक वास्तव समोर येत असल्याची गरजवंताला जाणीव होत नाही. ती जाणीव सतत ठेवणं अथवा योग्यवेळी कोणीतरी करून देणं अधिक आवश्यक असतं. त्याचं आपल्याला ज्ञान नसतं असं नाही; परंतु एखादी वेळ अशी येते की त्याचं भान आपल्याला राहात नाही.
शिकवणारा क्षण हेच खरं शिक्षण
आपल्या आयुष्यात येणारा प्रत्येक क्षण आपल्याला जे काही शिकवतो तेच खरं शिक्षण होय. शिकवण कधी मिळाली, याचबरोबर ती कशी, कोठे आणि कोणाकडून मिळाली? हे देखील तितकंच महत्त्वाचं असतं. अनेक संस्थांमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्याचा प्रत्येक क्षण विलक्षण कसा ठरेल, ह्याकडे भर दिला जात असल्याचं दिसून येतं. संस्था परिसर आणि उपलब्ध सोई सुविधा, तेथील वातावरण ह्या सर्व बाबी निश्चितच विध्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या ठरतात. ह्या सर्वांचा अभ्यासपूर्ण विचार येथील संस्थांनी केल्यामुळे विद्यार्थ्यांना त्याचा लाभ मिळत राहतो. पदोपदी नावीन्यपूर्ण अनुभवाची प्रचिती घेत घेत नवनवीन विलक्षण क्षण विद्यार्थांना त्यामुळेच प्रगतीपथावर घेऊन जातात.
आज खरी गरज आहे योग्य करिअरच्या निवडीची, त्यायोगे चांगल्या नोकरी-व्यवसायाच्या आणि अर्थार्जनाच्या प्राप्तीची. आवड आणि निवड यांचा करिअरच्या दृष्टिकोनातून खूपच जवळचा संबंध असतो. तरीही केवळ आवड आहे म्हणून करिअरची निवड करणं उपयोगी ठरतंच असं नाही. अनेकदा आवडतं करिअर निवडलं तरीही केवळ ते आपल्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी उपयुक्त ठरतंय का? हेही बघणं जरुरीचं असतं. करिअरची आणि शैक्षणिक संस्थेची निवड करताना आपल्याला मिळणारा आंनद, समाधान आणि स्थैर्य महत्त्वाचं असतं. ह्या आनंदाला नोकरी मिळवण्याच्या प्रक्रियेत मुकावं लागणार नाही, दुःख पदरात पडणार नाही, नुकसान आणि मानसिक ताप होणार नाही हेही सतर्क राहून, डोळ्यात तेल घालून बघण्याची जरुरी असते.
साधेपणा म्हणजे भोळेपणा किंवा गबाळेपणा नव्हे
सद्य:स्थितीत अनेकवेळा साधेपणा म्हणजे भोळेपणा किंवा गबाळेपणा समजला जातो. अत्याधुनिकीकरणामुळे एकूणच आपल्या राहणीमानात बरेच बदल होत असतात. हे होणारे बदल एका अर्थी आपला विकासच घडवत असतात. आपलं केवळ नीटनेटकं राहणं हे पुरेसं नसून आपण चारचौघांमध्ये वेगळं आणि आकर्षक दिसणं आवश्यक झालं आहे. मुळातच सुंदर असणं आणि आकर्षक दिसणं या दोन्ही गोष्टी जरी सौंदर्याची अनुभूती देणाऱ्या असल्या तरीही केवळ सुंदर असणं सुद्धा पुरेसं नसून आकर्षक दिसणं आणि त्यासाठी नीटनेटकं राहणं आवश्यक असतं. यामुळे सुंदर असण्यापेक्षाही सुंदर दिसण्यासाठी काहीजणांचा कल असतो. अशा सुंदर आणि आकर्षक राहणीमानासाठी निश्चितच आर्थिकदृष्ट्या सक्षम असणं अनिवार्य असतं. ह्या राहणीमानाची नुसती सवय होऊन चालत नाही, तर असं राहणीमान टिकवून देखील ठेवता यावं लागतं. हे सर्व जसं आपण निवडत असलेल्या आपल्या करिअरवर, नोकरी-व्यवसायावर अवलंबून असतं, तसंच ते ज्या शैक्षणिक संस्थेतून आपण शिक्षण घेत असतो तेथील विविध उपक्रम, व्यक्तिमत्त्व विकासाच्या दृष्टिकोनातून आयोजित केल्या जाणाऱ्या कार्यक्रमांवर आणि निवडलेल्या नोकरी-व्यवसायावर देखील अवलंबून असतं. अनेकदा आपल्याला अशा अनेक बाबींची त्यावेळी जाणीवच होत नाही.
नोकरीचा धंदा
अर्थार्जनाचा पर्याय म्हणून नोकरी मिळवण्यासाठी वणवण करणाऱ्या प्रत्येकालाच चांगली संधी हवी असते. आपापल्या कर्तुत्वाला सिद्ध करण्याची आंतरिक इच्छा प्रत्येकालाच असते. नोकरी हा अर्थार्जनाचा उत्तम पर्याय असल्याने तो अधिक पसंत केला जातो. दैनंदिन भौतिक गरजांची पूर्तता करण्यासाठी नोकरीचा मार्ग स्वीकारतात. त्यासाठी काहीवेळा काही व्यक्ती इतकी उतावीळ झालेल्या असतात, की नोकरी मिळवण्यासाठी त्या काहीही (काहीही?) करायला तयार होतात. आपला त्यासंबंधीचा विचार, वर्तन आणि व्यवहार ह्या सर्वांची का बरं काही जाणीवच होत नाही? आपण नोकरी मिळवण्याच्या नादानं काय करत आहोत, ह्याचं का बरं भानच राहात नाही? म्हणजे नोकरी न मिळणे ही इतकी मोठी उणीव असते का, की ज्यासाठी एखादी व्यक्ती वाट्टेल तितका पैसा खर्च करायला तयार होते आणि ते देखील कोणतीही शाश्वती नसताना. ह्याचाच गैरफायदा घेऊन आर्थिक आणि मानसिक फसवणूक होण्याचं प्रमाण, गुन्हे दिवसेंदिवस वाढत आहेत. अनेकांनी नोकरीच्या नावाखाली फसवणूक करून आपली उखळ पांढरी केली आहेत. इंटरनेटच्या माध्यमातून आणि सोशल मीडियाच्या उपयोगातून नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली उच्चशिक्षित तरुण-तरुणींची अगदी दररोज फसवणूक होत आहे.
काही जणांनी तर नोकरी मिळवून देणारी दुकानेच थाटली आहेत. प्राथमिक नोंदणीचे पैसे भरायचे, ते देखील ऑनलाइन. संबंधित कंपनीचे कार्यालय नक्की कोठे आहे? कंपनी कोणाची आहे? खरंच खात्रीलायक सेवा कंपनीकडून दिल्या जातात का? स्थानिक, देशभरातील आणि विदेशांतील नोकरीसाठी उच्चशिक्षित परंतु बेरोजगार व्यक्ती केवळ फोनवर झालेल्या चर्चेवर विश्वास आणि निश्चितच चांगली नोकरी मिळेल हा भरवसा ठेवून हजारो, लाखो रुपये खर्च करतात. कालांतरानं आपली फसवणूक झाल्याचं कळतं, खात्री पटते. झालेल्या वेळेचा, पैशाचा खर्च आणि मनस्ताप ह्यातून सावरताना होणाऱ्या मानसिक यातना ज्याच्या त्यालाच कळतात, भोगायला लागतात. नोकरीचा धंदा होऊन बसला आहे, ह्याची का बरं जाणीव होत नाही? खासगी, सरकारी, निमसरकारी, शैक्षणिक, औद्योगिक, बॅंकिंग, माहिती-तंत्रज्ञान अशा अनेक क्षेत्रामध्ये विविध प्रकारच्या नोकरीसाठी फसवणूक मोठ्या प्रमाणावर होत असल्याचं माहीत असूनही का बरं आपण गाफील राहतो?
प्रा. शैलेश कुलकर्णी