ठाणे – राज्यात करोनाने थैमान घातलं आहे. ऑक्सिजन आणि गंभीर रुग्णांसाठी आधार ठरत असलेल्या रेमडेसिव्हीरचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. राज्यात सगळीकडेच हे चित्र असून अनेक ठिकाणी रुग्ण दगावत आहेत. ठाण्यातही आरोग्य सुविधा तोकडी पडत असून ऑक्सिजन आणि रेमडेसिव्हीरचा तुटवडा भासत आहे. यावरून गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हान यांच्या पत्नी ऋता आव्हाड आक्रमक झाल्या आहेत.
ऋता आव्हाड यांनी करोना रुग्णांची होत असलेली गैरसोय पाहता, थेट ठाणे महापालिकेसमोर ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनात त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची साथ मिळाली असून मनसेचे अविनाश जाधव देखील या आंदोलनात सामील झाले होते. यावेळी ऋता आव्हाड यांनी मनसेच्या साथीत ठाणे महापालिकेविरोधात घोषणाबाजी केली.
ठाणे महापालिकेत आज पालिकेची महासभा होती. यावेळी महापालिकेच्या वतीने ऋता आव्हाड यांच्यासह राष्ट्रवादी आणि मनसेच्या कार्यकर्त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे येथील वातावरण काही काळासाठी तणावपूर्ण झालं होतं.