मुंबई : ईडीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्या श्री साईबाबा गृहनिर्मिती प्रा. लि. कंपनीवर काल कारवाई केली. या कारवाई दरम्यान ११ फ्लॅटवर ईडीने टाच आणली आहे. केंद्रीय तपास यंत्रणेने थेट मुख्यमंत्र्यांच्या मेहुण्यांविरोधात कारवाई केल्याने राज्याच्या राजकीय वर्तुळामध्ये एकच खळबळ उडाली आहे. या कारवाईवर प्रतिक्रिया देताना राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी खळबळजनक वक्तव्य केले आहे.
एका वृत्तवाहिनीशी बोलताना आव्हाड यांनी तपास यंत्रणांचा वापर करुन राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार अस्थिर करण्याचा जो काही प्रयत्न सुरू आहे त्यावर आता वरिष्ठ पातळीवर चर्चा होईल. पण माझं मत विचाराल तर मी माझ्या पोरीला महाराष्ट्रात ठेवणार नाही असे वक्तव्य राज्याचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. तसेच त्यांच्या मुलीला नुसतं चौकशीला बोलवलं तरी ती आत्महत्या करेल असे धक्कादायक विधान त्यांनी केले आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी हे वक्तव्य केल्यानंतर सर्वांच्याच भूवया उंचावल्या आहेत. पण त्यांनी हे वक्तव्य का केले हे मात्र स्पष्ट झाले नाही. जितेंद्र आव्हाड पुढे म्हणाले की, “राज्याने कुणावर कधी अशी सूडबुद्धीन कारवाई केली नाही, कुणाला जेलमध्ये टाकलंय असं झालं नाही. चौकशी सुरू असणं आणि घरात धाडी टाकणं यात फरक आहे.”
“एकूण कुटुंबाच्या दष्टीने विचार करता…” असं विचारण्यात आलं तेव्हा प्रश्न पुर्ण होण्याआधीच आव्हाड यांनी, “मी अगदी स्पष्टपणे सांगतो, कोणी बोलो अथवा नाही पण भीती ही माणसाला खात असते. रात्री तीन वाजता टक् टक् झालं तर हार्ट अटॅक येण्याचीच शक्यता असते,” असं उत्तर दिलं.
पुढे बोलताना आव्हाड यांनी, “आज ३८ वर्षे होत आले मी राजकारणात आहे. माझ्या पोरीचा काय राजकारणाशी संबंध आहे. पण आज ती किती ठिकाणी डायरेक्टर आहे. जर नुसतं बोलवलं तर ती आत्महत्या करेल,” असं वक्तव्य केलं. “बापरे! हे फार मोठं वक्तव्य आहे तुमचं,” अशी प्रतिक्रिया महिला पत्रकाराने दिली. त्यावर बोलताना आव्हाड यांनी, “ते फ्री बर्ड्स आहेत ना त्यांना या असल्या सवयी नाहीत ना,” असं म्हटलं. जितेंद्र आव्हाड यांच्या मुलीचं नाव नताशा असं असून काही महिन्यांपूर्वीच तिचं लग्न झालं आहे.
“पण मग तुमची मुलगी या देशात राहणार नाही की काय?,” असा थेट प्रश्न विचारला असता आव्हाड यांनी नकारार्थी मान डोलवली. पुढे बोलताना त्यांनी, “मला तर वाटतं तिने राहू नये, वातावरण इतकं गढूळ होत राहिलं आहे. मी करोनामध्ये जेव्हा होतो तेव्हा मी तिची जी परिस्थिती बघितलेली तीच मला भितीदायक वाटत होती,” असं सांगितलं. “पण आता जर काही… माझ्या बाबतीत घडणार नाही याची मला १०० टक्के खात्री आहे, पण उद्या झालच तर मला पहिला मनात विचार येतो की माझ्या पोरीचं काय होईल,” असेही आव्हाड म्हणाले.