मुंबई : विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी संभाजी महाराजांबद्दल केलेल्या विधानावर आता भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी अजित पवार यांच्यावर खालच्या भाषेत टीका केली. संभाजी महाराज धर्मवीर नव्हते म्हणणाऱ्यांची कदाचित सुंता झाली असती, असे पडळकर म्हणाले आहेत. पडळकर यांच्या याच विधानाला राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. संभाजी महाराज स्वराज्यरक्षकच होते, असे आव्हाड म्हणाले आहेत.
“तुम्हाला काय म्हणायचे आहे ते म्हणा. तुमच्या म्हणण्याला माझ्या दृष्टीने शून्य अर्थ आहे. संभाजी महाराज स्वराज्यरक्षक होते, असे अजित पवार म्हणाले. मी या मताशी सहमत आहे. संभाजी महाराज स्वराज्यरक्षकच होते. संभाजी महाराज अन्य काही विचार करत असते, तर त्यांनी सुलतान अकबराला आपल्या जवळ सहा वर्षे ठेवलेच नसते. आपल्या मुलाने बंड केले. या बंडाला संभाजी महाराज मदत करत आहेत, ही बाब औरंगजेबाला सहन होत नव्हती. औरंगजेब अंगावर येण्याचे हे एक कारण होते,” असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.
अजित पवारांवर टीका करताना गोपीचंद पडळकर म्हणाले, “संभाजी महाराज धर्मवीर नसते तर ‘संभाजी महाराज धर्मवीर नव्हते’ असं म्हणणाऱ्यांची कदाचित ‘सुंता झाली असती. त्यांना जर तसं वाटत असेल तर प्रसारमाध्यमांच्या मित्रांना माझी विनंती आहे की, त्यांनी तिथे जाऊन खरी परिस्थिती काय आहे? हे तपासावं.” संभाजी महाराज धर्मवीर नसते तर अशी परिस्थिती झाली असती की नसती? हे मला सांगा, असा सवालही गोपीचंद पडळकरांनी केला.