जामखेड : शहरात जिओ सेवेचा बोजवारा उडाला आहे. गेले दोन महिने सुरू असलेल्या अनागोंदी व सतत खंडित होणाऱ्या सेवा, लाईट गेल्यास रेंज गायब, अशा अनेक समस्यामुळे जिओच्या भोंगळ कारभाराचा नागरिकांना फटका सहन करावा लागत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहे.
जामखेड शहरात जिओ मोबाईल कंपनीचे तीन टॉवर असून याव्दारे शहरातील हजारो ग्राहकांना सेवा दिली जाते. कंपनीने स्वस्तात सेवा चालू केल्याने अनेक ग्राहकांनी वेगवेगळ्या कंपनीची सेवा सोडून जिओ सेवा सुरु केली. मात्र, मागील दोन ते तीन महिन्यापासून जिओ सेवेचा बोजवारा उडाला आहे. सतत सेवा खंडित होत असून, प्रत्येक टॉवरला जनरेटर आहे तरीही लाईट गेल्यास पाच ते दहा मिनिटेच इंटरनेटसह रेंज जात असून नागरिक पुरता वैतागला आहे.
जामखेड शहरात सध्या लाईटची समस्या असून, सतत लाईट जाते. लाईट गेल्यास जिओची रेंज लगेच जाते. नागरिकांनी अनेक वेळा कंपनीला तक्रार करूनही कंपनीचे अधिकारी दखल घेण्यास तयार होत नाही. जिओ कंपनीच्या अनागोंदी कारभाराचा पाढाचं वाचायची वेळ आली आहे.
शहरातील ग्राहकांची संख्या लक्षात घेता शहरात आणखी एक टॉवर उभारण्याची मागणी होत आहे. सर्व्हर डाऊन , कॉल ड्रॉपच्या समस्येने शहरातील नागरिक हैराण झाले आहेत. जिओच्या सेवेच्या गलथान कारभाराचा फटका सर्वच ग्राहकांना बसत आहे. एकदा हा सर्व्हर डाऊन आणि एकदा तो सर्व्हर डाऊन अशी कारणे सांगून जिओ कंपनी आपलीच निष्क्रियता ग्राहकांसमोर मांडत आहे. बहुतांश वेळा गतीने इंटरनेट सुविधा मिळत नाही. अतिशय संथगतीने इंटरनेट सुरू असते. जास्तीत जास्त एमबीपीएसची सेवा घेऊनही जर तेवढ्या प्रमाणात सेवा मिळत नसेल तर ग्राहकांनी ही सेवा का वापरायची असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे ग्राहकांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी आहे.