रांची – झारखंडमधील सत्तारूढ आघाडीचे अनेक आमदार सोमवारी सहा दिवसांनंतर आपापल्या घरी परतले. ( Jharkhand UPA MLAs return home after 6 days of high voltage drama) राजकीय पेच (Jharkhand political crisis) उद्भवण्याच्या शक्यतेने त्या आमदारांना छत्तिसगढ या शेजारील राज्यातील रिसॉर्टमध्ये हलवण्यात आले होते.
झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यावर स्वत:च्या नावे खाणकामाचे कंत्राट केल्याचा आरोप आहे. त्यावरून त्यांना आमदार म्हणून अपात्र ठरवण्याची शिफारस निवडणूक आयोगाने केल्याचे समजते. त्या शिफारसीवर राज्यपाल रमेश बैस यांच्याकडून निर्णय अपेक्षित आहे. मात्र, राज्यपालांनी निर्णय प्रलंबित ठेवल्याने झारखंडमध्ये राजकीय सस्पेन्स निर्माण झाला.
सरकार पाडण्यासाठी भाजप या प्रमुख विरोधी पक्षाकडून आमदारांची फोडाफोडी केली जाऊ शकते, अशी धास्ती सत्तारूढ आघाडीला वाटू लागली. त्यामुळे आघाडीच्या अनेक आमदारांना 30 ऑगस्टला छत्तिसगढला हलवण्यात आले.
भाजपला राजकीय शह देण्याच्या उद्देशातून आघाडी सरकारने सोमवारी झारखंड विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी छत्तिसगढच्या रिसॉर्टमध्ये मुक्काम ठोकलेल्या आमदारांना रविवारी सायंकाळी झारखंडमध्ये आणण्यात आले. मात्र, त्यांना घरी न जाऊ देता रांचीमधील विश्रामगृहात ठेवण्यात आले.
त्यांना विश्वासदर्शक ठरावावर मतदान करण्यासाठी विधानसभेत नेण्यात आले. सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकल्यावर आमदार अखेर आपापल्या घरी परतले. झारखंडमध्ये झामुमो, कॉंग्रेस, राजद आघाडीचे सरकार आहे.