मुंबई- नागरिकांचे बहुतांश व्यवहार आता वेगाने पूर्वपदावर आल्यामुळे दसऱ्यात सोने आणि दागिन्यांची विक्री वाढेल असे ज्वेलर्स वाटते. ऑल इंडिया जेम अँड ज्वेलरी डोमेस्टिक कौन्सिल या संस्थेचे अध्यक्ष अनंत पद्मनाभ यांनी सांगितले की, या वर्षी दागिन्यांच्या विक्रीत 60 ते 65 टक्के वाढ होईल अशी आम्हाला आशा आहे. गेल्या आठवड्यात दागिने खरेदीसाठी नागरिकांची विविध दालनाकडे विचारणा वाढली आहे. या आठवड्यात विक्रीत साधारणपणे 40 टक्के वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. लवकरच विवाह समारंभाच्या तारखा येत असल्यामुळे विवाहासाठीचे दागिने आणि दसऱ्यासाठीचे दागिने एकाच वेळी खरेदी करण्याचा ग्राहकांचा कल दिसून येत आहे.
गेल्या दोन महिन्यांमध्ये सोन्याचे दर 60 हजार रुपयांपर्यंत गेले होते. मात्र विविध देशातील औद्योगिक परिस्थिती सुधारत असल्यामुळे आता सोन्याचे दर 50 हजार रुपयांच्या दरम्यान आहेत. ग्राहकांना सोन्याचे दर यापेक्षा कमी होणार नाहीत असे वाटत असल्यामुळेही दसरा-दिवाळीच्या काळामध्ये सोन्याची खरेदी वाढेल, असे दागिने उत्पादकांना वाटते.
दागिने उत्पादक असलेल्या आदित्य पेठे यांनी सांगितले की, पहिले सहा महिने वाया गेले आहेत. त्यामुळे या तीन महिन्यांमध्ये ही तूट भरून निघेल अशी आम्हाला अपेक्षा आहे. त्या दृष्टिकोनातून आम्ही दागिन्यांचे उत्पादन करून ठेवले आहे. ज्यांना गुंतवणुकीसाठी सोने खरेदी करायचे होते त्यांनी अगोदरच सोने खरेदी करून ठेवलेले आहे. मात्र उत्सवाच्या काळात दागीन्याकडे जास्त ओढा असण्याची शक्यता त्यांना वाटते.
आशावादामागची कारणे
एक तर बऱ्याच महिन्यापासून ग्राहकांना दागिन्यांची खरेदी करता आलेली नाही. त्यामुळे ग्राहक दसऱ्यात लॉक डाऊनच्या काळात राहिलेली खरेदी पूर्ण करण्याची शक्यता आहे.त्याचबरोबर विवाह समारंभात नागरिकांना जास्त खर्च करता येणार नाही. कारण त्या ठिकाणी मर्यादित लोकांना उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे. त्यामुळे तो खर्च दागीन्याकडे वळू शकतो, असे दागिने उत्पादक अनंत पद्मनाभ यांनी सांगितले.