दीड महिन्यापूर्वी परतीच्या पावसात रस्ता गेला वाहून
जेजुरी – जेजुरी शहराला जोडणारा कोथळे-जेजुरी रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे. हा रस्ता जवळ जवळ अर्धा वाहून गेला आहे. जेजुरी परिसरातील कोथळे, रानमळा, भोसलेवाडी, जगताप वस्ती या लोकांसाठी जीवन वाहिनीच आहे. या गावांमधून अनेक लोक जेजुरी औद्योगिक वसाहतीत नोकरीसाठी जातात, तसेच मुले शाळा, महाविद्यालयात शिक्षणासाठी याच रस्त्यावरून ये-जा करीत असतात.
शेतकरी आपला माल विकण्यासाठी याच रस्त्याने जातात. मात्र, सध्या या रस्त्याची एवढी दुरवस्था झाली आहे की, लोक आपला जीव मुठीत घेऊन येथून वर्दळ करीत आहेत. याठिकाणी अनेक प्रकारचे किरकोळ अपघात झाले आहेत. मुले शाळेतून घरी येईपर्यंत पालकांमध्ये चिंतेचे वातावरण तयार झाले आहे.
गेल्या दीड महिन्यापूर्वी 25 सप्टेंबरला पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागात सायंकाळी अचानक ढगफुटीसदृश पाऊस झालाण, त्यामुळे येथील नदीला प्रचंड पूर आला. नदीकाठच्या शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. शेतकऱ्यांची उभी पिके वाहून गेली. तसेच नदीकाठच्या गावातील लोकवस्तीत पाणी शिरले लोकांच्या घरांचे व संसार उपयोगी वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
याचवेळी अनेक रस्तेही वाहून गेले. यामध्ये कोथळे-जेजुरी रस्ताही वाहून गेला. आज हा रस्ता अत्यंत धोकादायक स्थितीत असून, या रस्त्याची लवकरात लवकर दुरुस्ती व्हावी, अशी मागणी या परिसरातील नागरिक करीत आहेत.