आदरणीय शरद पवार साहेब हे कार्यकर्त्यांवर कुटुंबाप्रमाणे प्रेम करतात. संपूर्ण पवार कुटुंबीयांचे हे संचित कार्यकर्त्यांना बळ देणारे आहे. कोणत्याही कार्यकर्त्यांला आत्मविश्वास देऊन त्यांच्यात इच्छाशक्तीची फुंकर फक्त पवार कुटुंबीयांनी घातली आहे. आम्हा पानसरे कुटुंबीयांवर जीवापाड माया लावली. त्यांचा स्नेह आणि मार्गदर्शन आमच्यासाठी स्फूर्तीदायक आहे. सन्माननीय साहेबांचा शनिवार (दि.12) डिसेंबर रोजी 80 वा वाढदिवस साजरा होत आहे. त्यानिमित्त व्यक्त झालेल्या भावना.
संपूर्ण महाराष्ट्रात गेल्या तीन पिढ्यांच्या तना-मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या 80 वर्षांच्या तरुण योद्ध्याला मानाचा मुजरा…
सह्याद्रीचे पुत्र शरद हे…
रयतेचे राजे …
साक्ष कऱ्हेचे पाणी देईल …
महाराष्ट्र माझे …
आमदार रोहितदादा, खासदार सुप्रियाताई,
अजितदादा आणि पितामह साहेब.
अवघ्या पवार परिवाराच्या परिसस्पर्शाने आम्हा पानसरे परिवाराच्या आयुष्याचे सोने झाले, असे आम्हाला प्रामाणिकपणे वाटते. कितीही मोठी अडचणे, संकट येऊ द्यात, पण आपण साहेबांच्या पक्षाचे मावळे आहोत. आपण साहेबांचे आहोत, साहेब आपले आहेत, हा आत्मविश्वास जीवनाच्या यशस्वी वाटचालीसाठी बळ देणारा आहे. तसा आमचा परिवार साहेबांना मानणारा. त्यांच्या विचारधारेच्या पक्षाला मतदान करणारा. ज्या, ज्या निवडणुका असतील, त्यावेळी साहेबांचे प्रतिनिधी, उमेदवार कोण आहेत, हे पाहून त्यांनाच फक्त मतदान करणारे आम्ही पानसरे.
उद्योग-व्यवसायात स्थिरस्थावर होताना इतकेच काय, ते आमचे राजकीय नाते.
परंतु 2007 मध्ये तत्कालीन आमदार अशोकभाऊ टेकवडे आणि जेजुरीनगरीचे सर्वेसर्वा पितृतुल्य दिलीपदादा बारभाई यांच्यामुळे मला स्वीकृत नगरसेवकपदी काम करण्याची संधी मिळाली. माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या परिवारात खऱ्या अर्थाने प्रवेश झाला. आमदार अशोकभाऊ, दिलीपदादा, सुदामआप्पा इंगळे, माणिकमामा झेंडे पाटील, जेजुरीनगरीतील माझे नगरसेवक सहकारी यांच्या समवेत गोविंदबाग (बारामती) मोतीबाग (पुणे), सिल्व्हर ओक (मुंबई) किंवा दिल्ली येथील 6 जनपथ येथे विकासकामे घेऊन जाताना साहेबांचे, नामदार अजितदादा, खासदार सुप्रियाताईंचे मोलाचे मार्गदर्शन आम्हा सर्वानाच विशेषतः मला मिळाले. उद्योग, व्यवसाय करताना अथवा यामध्ये प्रगतीकडे वाटचाल करताना मला मोठा फायदा झाला आहे, होत आहे.
साहित्य, संगीत, कला, क्रिडा, कृषी, शैक्षणिक, सामाजिक, उद्योग व्यवसाय या सर्वच क्षेत्रात 55 वर्षे व्यापून राहिलेले आपले सर्वांचे साहेब हे एकमेव आहेत. साहेबांचा व्यासंग दांडगा आहे. राजकीय सामाजिक जीवनाच्या वाटचालीतील अनुभवांचे लेखन (दै. सकाळ, रविवार पुरवणीत आलेले लेख) आम्हा कार्यकर्त्यांसाठी दीपस्तंभ आहे. जात -पात, धर्म, वर्ण, वंश या भेदाभेदीच्या अभिनिवेषाला थारा न देता प्रामाणिकपणे कार्यरत राहणाऱ्या आणि सामाजिक बांधिलकी जोपासत वाटचाल करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी साहेब खंबीरपणे राहतात, हा अनुभव मी स्वतः घेतला आहे.
2012 मध्ये मला नगरपालिका निवडणुकीत अल्पशा मतांनी अपयश आले. तेंव्हा दिलीपदादांसमवेत आम्ही काही कार्यकर्ते गोविंदबाग (बारामती) येथे साहेबांकडे गेलो होतो.
यावेळी सर्व आढावा घेऊन प्रत्येकाची चौकशी करून अपयश आले. तरी खचून जाऊ नका, संधी पुन्हा पुन्हा मिळते, आणि यश आले तर हुरळून जाऊ नका.
पाय जमिनीवर ठेवून समाजहितासाठी संधीचे सोने करा. हा मौलिक सल्ला साहेबांनी दिला. साहेबांचा हा सल्ला आम्हाला आत्मबल देऊन गेला. त्यानंतर पुन्हा जेजुरी नगरपालिकेच्या 2017 मधील निवडणुकीत माझ्या पत्नी सौ. अमीना यांना संधी मिळाली. त्या चांगल्या मतांनी विजयी झाल्या. या 13 वर्षांच्या काळात अनेक छोटी-मोठी सर्वसामान्यांची कामे,आणि विकासकामे मार्गी लावण्यासाठी साहेब, अजितदादा, तसेच खासदार सुप्रियाताईंकडे जाण्याचा योग आला. यावेळी आमच्या पुरंदरमधील सुदामआप्पा इंगळे,माणिकमामा झेंडे पाटील, दिलीपदादा बारभाई, पुणे येथील प्रवीण शिंदे आदी मान्यवर असायचेच. सर्वांचीच प्राथमिक विशेषतः कौटुंबिक, व्यावसायिक चौकशी होऊन विकासकामे मार्गी लागली आहेत, होत आहेत.
ब्रिटिशकालीन जेजुरी रेल्वेस्थानकाचा कायापालट झाला पाहिजे. येथे येणाऱ्या भाविक, भक्त, प्रवाशांना रेल्वे स्थानकात सोयी- सुविधा मिळाल्या पाहिजेत, यासाठी मी माझी पत्नी नगरसेविका अमिना, स्थानिक कार्यकर्ते पाठपुरावा करीत होतो. याबाबत सन्मानीय साहेबांना निवेदन देण्यात आले होते. त्यानुसार खासदार सुप्रियाताईंनी जेजुरी रेल्वेस्थानकात भेट देत पाहणी केली. माहिती घेतली. दिल्ली येथे रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष, वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली. प्रस्ताव तयार केला. खऱ्या अर्थाने 2017 मध्ये जेजुरी स्थानकाचा चेहरामोहरा बदलण्याच्या कामांस सुरुवात झाली. 2019 पर्यंत ओव्हरब्रीज, पुणे ते सातारा मार्गावरील विद्युतीकरण, स्थानकाचे छत बदलणे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छतागृह, विश्रामगृह, प्लॅटफॉर्मची उंची वाढवणे
रेल्वेस्थानकात कायमस्वरूपी पोलीस अधिकारी-कर्मचारी नियुक्त करणे, रेल्वेस्थानकाला जेजुरी गडासारखे स्वरूप देणे आदी कोट्यवधी रुपयांची कामे पूर्ण झाली आहेत. याचे सर्व श्रेय साहेब आणि ताईंना आहे. या कामावेळी अधिकाऱ्यांसमवेत वेळोवेळी बैठका झाल्या. त्यावेळी ताईंनी आम्हा उभयतांना बैठकीत पाचारण केले. सन्मानाची वागणूक दिली. यातूनच आमचे कौटुंबिक व जिव्हाळ्याचे नाते निर्माण झाले. या कामाच्या काळात ताईंनी चारवेळा तर साहेबांनी दोनवेळा रेल्वे स्थानकात भेट देत कामांचा आढावा घेत मार्गदर्शन केले.
साहेब, ताई, दादा यांच्या निकट जाणे सोपे नाही. गेले तर विश्वास संपादन करणे सोपे नाही. पण एकदा का विश्वास संपादन झाला तर मग त्यांची पाठीवर पडलेली शाबासकीची थाप दहा हत्तीचे बळ देऊन जाते. 2019 मध्ये सध्याचे देवसंस्थान विश्वस्तांसमवेत दिल्लीला साहेबांकडे जाण्याचा योग आला. यावेळीही सर्वांची ओळख करून घेत आस्थेने चौकशी करीत साहेबांनी पुरंदर विमानतळाबाबत केलेली दहा मिनिटांनी चर्चा ही पुढील 50 वर्षांचा मागोवा घेणारी व भविष्याचा वेध घेणारी होती. काळाची पावले ओळखत वाटचालीसाठी मार्गदर्शक आहेत.
2019 च्या विधानसभा निवडणुकीत विरोधकांचे प्रमुख लक्ष साहेबच होते. हे अवघ्या महाराष्ट्राने अनुभवले आहे. परंतु आमचे 80 वर्षांचे तरुण योद्धे अवघा महाराष्ट्र पिंजून काढतात. भरपावसातसुद्धा उत्साहाने सभा घेतात, हाच संदेश हाच आम्हा कार्यकर्त्यांना प्रतिकूल परिस्थितीमध्ये लढायचे कसे, हा यशाचा, विजयाचा मार्ग दाखविणारा आहे.
साहेब, तुम्ही साहेब आहात. आम्हा बहुजनांच्या गळ्यातील ताईत आहात. आपणास उदंड, उदंड आयुष्य लाभो, हीच खंडेरायाचरणी प्रार्थना.
– मेहबूबभाई पानसरे, माजी नगरसेवक, जेजुरी नगरपरिषद.
शब्दांकन : शिवराज झगडे (जेजुरी).