बीड: राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश करत मंत्रिपद मिळवणाऱ्या जयदत्त क्षीरसागर यांनी ५० कोटी देऊन मंत्रिपद मिळवले असल्याचा आरोप जयदत्त क्षीरसागर यांचे पुतणे संदीप क्षीरसागर यांनी केला आहे. येणाऱ्या विधान सभेत जयदत्त क्षीरसागर हे सेनेचे तर संदीप क्षीरसागर हे राष्ट्रवादीचे उमेदवार असणार आहेत. त्यामुळे क्षीरसागर कुटुंबातील वाद पाहायला मिळत असून त्यातून आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात असल्याचे चित्र आहे.
राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलेल्या जयदत्त क्षीरसागर यांना आता चांगलाच गृह कलहाचा सामना करावा लागणार आहे. कारण जयदत्त क्षीरसागर शिवसेनेचे उमेदवार आणि पुतण्या संदीप क्षीरसागर राष्ट्रवादीचे उमेदवार असल्याचे आगामी विधानसभेत पाहण्यास मिळणार आहे. अशा स्थितीत एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जाऊ लागल्या आहेत. संदीप यांच्या आरोपाने शिवसेनेच्या पक्षीय धोरणावरच भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. त्यामुळे त्यांच्या या आरोपाचे शिवसेना कशी खंडण करणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
जयदत्त क्षीरसागर आपल्याला वानरांची सेना म्हणतात. मात्र जयदत्त क्षीरसागर यांच्यासारखा गर्विष्ठ रावणाची लंका जाळण्यासाठी वानर सेनेची आवश्यकता आहे. आणि ते आम्ही करून दाखवणार अशा शब्दात संदीप क्षीरसागर यांनी जयदत्त क्षीरसागर यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. “सत्तेचा वापर प्रॉपर्टीसाठी केला म्हणूनच राज्यात आणि देशात एवढेच नव्हे तर परदेशात सुद्धा दोघा भावांनी म्हणजे जयदत्त आणि भारतभूषण क्षीरसागर यांनी प्रॉपर्टी घेतली,” असा आरोप संदीप क्षीरसागर यांनी जाहीर सभेतून केला