कोल्हापूर : विठ्ठलाची नगरी अर्थात पंढरपुर मधील कराडकर मठाचे मठाधिपती जयवंत महाराज पिसाळ यांचा आठ दिवसापूर्वी मठात निर्घृण खून झाल्याच्या घटनेनंतर कोल्हापूरात आज त्याच्या सहकारी आणि नातेवाईकांनी पत्रकार परिषद घेऊन या खुन्यातील गुन्ह्यांना लवकर न्याय मिळावा यासाठी हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा आणि विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी अशी मागणी केली आहे.
पंढरपुर मधील कराडकर मठाचे मठाधिपती जयवंत महाराज पिसाळ यांचा आठ दिवसापूर्वी मठात निर्घृण खून झाला आहे. या धक्कादायक प्रकारामुळे वारकरी संप्रदायात चांगलीच खळबळ उडाली आहे. जयवंत महाराज कराडकर यांचा निर्दयीपणे खून करणाऱ्या बाजीराव जगताप याला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी नातेवाईकांसह महाराजांचे मूळ गाव असलेलेल्या लवंडमाची इथल्या ग्रामस्थानी केली.
आज कोल्हापूरात पत्रकार परिषद घेत वारकरी संप्रदायाला धक्का लावणाऱ्या जगतापच्या कृत्याचा त्यांनी निषेध केला. मठाच्या ट्रस्टींना आरोपी बाबुराव जगताप यांचे वर्तन माहित होते म्हणूनच त्यांनी जयवंत महाराजांची मठाधिपती म्हणून नेमणूक केली होती. याच द्वेषातून जगतापकडून वारंवार ट्रस्टी आणि महाराजांना धमक्या दिल्या जात होत्या असा आरोप यावेळी त्यांच्या सहकाऱ्यांनी केला.
जगतापला प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे मदत करणाऱ्या सर्वांची सखोल चौकशी करण्यासह या खून खटल्यात सरकारी वकील म्हणून ऍड उज्वल निकम यांनी नेमणूक करावी, फास्ट ट्रक कोर्टात हा खटला चालवावा, अशी देखील मागणी त्यांनी केली. आरोपी बाजीराव जगतापचे वकीलपत्र घेऊ नका, असे आवाहन सुद्धा यावेळी नातेवाईक आणि ग्रामस्थांनी केले.