वॉशिंग्टन – भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी आज अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री माईक पॉम्पेओ यांच्याशी फोन वरून चर्चा केली. जगात उद्भवलेल्या करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर एकमेकांशी समन्वय ठेवण्याच्या दृष्टीने ही चर्चा झाली.
करोनाची समस्या उद्भवल्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये झालेली ही दुसरी चर्चा आहे. करोनाच्या समस्येशी दोन हात करण्याच्या संबंधात केल्या जाणाऱ्या उपाययोजनांविषयी या नेत्यांमध्ये चर्चा झाली. या महामारीच्या काळात जगभर औषधे आणि वैद्यकीय उपकरणांचा पुरवठा सुरळीत ठेवणे वगैरे विषयांवर त्यांच्यात चर्चा झाली.
आज करोनामुळे जगभरात साडे आठ लोक बाधित झाले असून मृतांचा आकडा हा 42 हजारांच्यावर गेला आहे. ही एक आंतरराष्ट्रीय समस्या बनल्याने जगातील महत्वाच्या देशांनी एकमेकांशी समन्वय साधून त्यावर उपाययोजना केली पाहिजे त्यात भारत आणि अमेरिका यांच्यातील सहकार्यही महत्त्वाचे आहे, असे अमेरिकेच्या विदेश व्यवहार विभागाचे प्रवक्ते मॉर्गन ऑर्टागस यांनी म्हटले आहे.