विनोद मोहिते
निष्ठावंतांनी दाखवली विरोधकांना जागा; बंडखोरांचा बार ठरला फुसका
इस्लामपूर – इस्लामपूर विधानसभा मतदार संघात सलग सातव्यांदा विजयी होत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सर्व विरोधकांना त्यांची जागा दाखवून दिली आहे. राज्याच्या विविध भागात दौऱ्यावर असताना अचूकपणे विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम केल्याचे मतमोजणीनंतर स्पष्ट झाले. राज्यपातळीवर राष्ट्रवादीची वाताहात झाली असताना पुन्हा जोमाने पक्षबांधणीसाठी करुन पश्चिम महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादीला पुन्हा नवसंजीवनी दिली आहे. जयंत पाटील यांच्या विजयाने वाळवा तालुक्यातील विरोधकांचा बार नेहमीप्रमाणेच फुसका ठरला आहे.
राज्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या पुढाकाराने महायुती तर्फे निवडणूक रिंगणात उभे राहिलेले शिवसेनेचे उमेदवार गौरव नायकवडी यांना तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. हा स्वतःच्या मतदारसंघातील खोत यांचा खूप मोठा पराभव आहे. तर थेट नगराध्यक्षपदी विराजमान झालेले निशिकांत पाटील यांनी बंडखोरी केली. जयंत पाटलांचे विरोधात निवडणूक प्रचारादरम्यान वापरलेली आक्रमक भाषा आणि आत्मविश्वास त्यांना नडला.
शहराची निवडणूक वेगळी असते. विधानसभा निवडणुकीत जयंत पाटील यांना धूळ चारत विधानसभेत जाऊ हे त्यांचे स्वप्नचं राहिले. भावी आमदार अशी डिजिटल लाऊन कोणाला कधी निवडणुकीत यश मिळवता येत नाही. हे यानिमित्ताने सिध्द झाले. तब्बल तीस वर्षे मतदारांची सेवा करणाऱ्या जयंत पाटील यांना जनता कशी नाकारेल, हे त्यांच्या समर्थकांनी जाणून घेतलेच नाही.
नायकवडी व नगराध्यक्ष पाटील यांना मतदारांनी नाकारल्याने त्यांच्यावर आता आत्मचिंतनाची वेळ येणार आहे. विकास आघाडीच्या झेंड्याखाली एकत्र येणाऱ्या जयंत पाटील पारंपरिक विरोधी गटातील नेत्यांमध्ये गट पडले होते. मला एकटे पाडले कार्यकर्त्यांच्या दबावापोटी मी निवडणूक लढवली. असे सांगणाऱ्या निशिकांत पाटील यांना नगराध्यक्ष पदाचा उर्वरित अडीच वर्षाचा कालखंड पूर्ण करताना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. जयंत पाटील यांचे इस्लामपूर शहराशी अतूट नाते असल्याचे यानिमित्ताने स्पष्ट झाले.
विकास कामांच्या बाबत मतदारसंघांमध्ये असणारे सातत्य, विविध उपक्रमातून जनतेला थेट लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न, महापूर सारख्या आपत्कालीन स्थितीमध्ये जयंत पाटील यांचे संपूर्ण कुटुंब मतदारांच्या नव्हे तर आपल्या घरातल्या व्यक्तींसाठी धावले. याचे ऋण मतदारांनी मतपेटीतून व्यक्त केले. परिणामी त्यांना सर्वाधिक मताधिक्य देण्यात झाला. मी उरण परिसरातील आहे. इस्लामपूरचा आमदार करा अशी भावनिक साद घालली गेली. निशिकांत दादांनी प्रचारामध्ये केलेल्या वातावरण निर्मितीचा फुगा मतमोजणीनंतर फुटलेला दिसला. तब्बल साडेअकरा हजार मताधिक्य इस्लामपूर शहरात जयंत पाटील यांनी घेतले. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंदराव पवार हे स्वतः नगरसेवक आहेत.
त्यांचे पाच नगरसेवक शिवसेनेचे असताना शिवसेनेच्या चिन्हावर लढणाऱ्या गौरव नायकवडी यांना अगदी अत्यल्प मत इस्लामपूर शहरात मिळाली. शिवसेनेच्या दृष्टीनेही चिंतेची बाब ठरली आहे. मतदार संघातील जनतेशी तीस वर्षापासून जपलेला जिव्हाळा, प्रेम, राज्यपातळीवर आपल्या सहकाऱ्यांना यापूर्वी दिलेली संधी यामुळे निवडणूक सहज सोपी झाली. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्षपद स्वीकारल्यानंतर पक्ष अडचणीत आला असताना राज्याची जबाबदारी सांभाळताना जयंत पाटील यांनी मिळवलेले प्रचंड मताधिक्य कार्यकर्त्यांना ऊर्जा देणारे आहे.
निवडणुकीचा अर्ज भरायला देशाचे माजी कृषी मंत्री शरद पवार झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. जयंत पाटील यांना अडचणीत आणण्याचा चंग निशिकांत पाटील यांनी एक दिड वर्षांपासून बांधला होता. भारतीय जनता पार्टीतून प्रचंड तयारी केली होती. मात्र विरोधी गटातील फुट पडल्याने मंत्री सदाभाऊ खोत यांनी ही उमेदवारी शिवसेनेच्या मार्फत गौरव नायकवडी यांच्या गळ्यात मारली. वास्तविक स्वातंत्र्य संग्रामात क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी यांची डावी विचारसरणी असायची. त्याच्या परस्परविरोधी भूमिका घेत नातू गौरव हा निवडणुकीला उभा राहिला. हुतात्मा कारखाना कार्यक्षेत्रातील अनेक कार्यकर्ते नाराज होते. ते मतदानानंतर दिसून आले. विरोधकांनी जयंत पाटील यांच्यावर टीका टिपणी करत प्रचारामध्ये रंगत आणली, गर्दी खेचली. या रणधुमाळीत मात्र जयंत पाटीलच किंगमेकर ठरले.
जयंत पाटील लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या निधनानंतर राजकारणात आले. मुलांनी उच्च शिक्षण घेऊन उद्योग-व्यवसाय स्थिर व्हावे, अशी राजारामबापूंची इच्छा होती. अमेरिकेमध्ये सिव्हील इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतल्यानंतरही बापूंच्या पश्चात जयंतराव पाटील यांना राजकारणात यावे लागले. सुरुवातीला 1985 साली ते कासेगाव शिक्षण संस्थेचे व राजारामबापू कारखान्याचे ते अध्यक्ष झाले. पाच वर्षाने 1990 च्या विधानसभेसाठी त्यांनी निवडणूक लढवली.
त्यावेळी स्वर्गीय विलासराव शिंदे यांचा पराभव करुन त्यांनी विधानसभेत पाऊल ठेवले होते. 1999 साली महाराष्ट्रात निवडून आलेल्या आघाडी सरकारमध्ये जयंत पाटील यांना अर्थमंत्री पदाची जबाबदारी पार पाडली. राज्य आर्थिक अडचणीत असताना ते सलग दहा वर्षे अर्थमंत्री राहिले. 26/11 चा बॉम्ब स्फोट झाल्यावर त्यांनी राज्याच्या गृहमंत्री पदाची जबाबदारी पेलली. काही वर्षे ग्रामविकासमंत्री राहिले. अडचणींच्या वेळी मिळेल त्या मंत्रीपदावर प्रभावीपणे काम केले आहे. आणि आता सलग सातव्यांदा विजयी होऊन त्यांनी सप्तरंगी विजय साकारला आहे.