मुंबई – पूजा चव्हाण आत्महत्या आणि सचिन वाझे प्रकरण हाताळण्यात अपयश आल्यामुळे अनिल देशमुख यांच्याकडे असलेलं गृहखातं काढून घेण्यात येणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यामुळे मंत्रीमंडळात खांदेपालट होणार असे संकत मिळत आहेत. आता गृहमंत्री बदलण्यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
प्रदेशाध्यक्ष पाटील म्हणाले की, गृहमंत्री आणि मुंबईचे पोलीस आयुक्त यांच्याबाबत कोणतेही अंदाज बांधण्याची गरज नाही. गृहमंत्र्यांचा राजीनामा घेण्याची गरज नाही. त्यामुळे अशा वावड्या उठवण्याची आश्यकता नाही. राज्याच्या गृहमंत्रीपदी अनिल देशमुख हेच राहणार आहेत. माध्यमांमध्ये कुणाच्याही नावांची चर्चा असली तरी खातेबदल होण्याची शक्यता नसल्याचे पाटील यांनी सांगितले.
दरम्यान सचिन वाझे प्रकरणामध्ये गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कुठलीही चूक केल्याचे दिसून आलेले नाही. गृहमंत्री योग्य प्रकारे काम करत असल्याचा दावा पाटील यांनी केला. तसेच या प्रकरणात सुरुवातीला एटीएस तपास करत होती. नंतर त्यात एनआयएने तपास सुरू केला. त्यांना अधिक माहिती मिळाली. त्यानुसार कारवाई झाली. या प्रकरणात कुणालाही पाठीशी घालण्याचा सरकारचा हेतू नसल्याचे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.
तत्पूर्वी गृहमंत्री देशमुख यांना हटवून त्यांच्या जागी उपमुख्यमंत्री अजित पवार किंवा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे देण्यात यावे. राजकीय वर्तुळात आज सकाळपासून ही चर्चा सुरू झाली आहे. मात्र जयंत पाटील यांनी अशा सर्व शक्यता फेटाळून लावल्या आहेत.