मुंबई : राज्यात करोना रुग्णाच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी राज्यातील नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी चौथ्या लाटेला जर रोखायचे असेल तर पुन्हा एकदा आपण स्वत:हून मास्क वापरणे, सुरक्षित अंतर ठेवणे आणि कोविड प्रतिबंधक लस प्राधान्याने घेण्याची गरज असल्याचे म्हटले आहे.
सांगलीत महाराष्ट्र दिनानिमित्त पोलीस दलाच्या परेड ग्राऊंडवर आयोजीत केलेल्या सोहळ्यात जयंत पाटील बोलत होते. करोनाच्या चौथ्या लाटेची शक्यता असल्याने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले. करोनाच्या तीन लाटांचा यशस्वीपणे सामना करुन आपण धैर्याने उभे आहोत. पण आता चौथ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राज्यातील करोना रुग्णांच्या संख्येत देखील वाढ होत आहे. या चौथ्या लाटेला उबंरठ्यावरच रोखायचे असेल तर पुन्हा एकदा आपण स्वत:हून मास्क वापरणे, सुरक्षित अंतर ठेवणे आणि कोविड प्रतिबंधक लस प्राधान्याने घेणे आवश्यक आहे. आणि जर पुन्हा आपल्याला बंधने नको असतील तर आपण स्वयंशिस्त पाळणे अनिवार्य असल्याचे जयंत पाटील म्हणाले.
महाराष्ट्राने समाज जीवनाच्या सर्वच क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी केली आहे. कृषी, उद्योग, व्यापार, सहकार, शिक्षण, संशोधन, साहित्य, नाटक, चित्रपट, कला, संस्कृती अशा सर्वच क्षेत्रात महाराष्ट्राने आपले अव्वल स्थान कायम राखले आहे. देशातील प्रगतशील आणि पुरोगामी राज्य म्हणून आज महाराष्ट्राचा लौकिक आहे.
राज्यात असलेल्या महाविकास आघाडी शासनाने गेल्या अडीच वर्षात राज्याच्या विकासाच्या दृष्टीने अनेक महत्वाचे निर्णय घेतले आहेत. संकटांची मालिका सुरु असतानाही सर्व आघाड्यांवर लढण्यात, दिलासा देण्यात शासनाला यश आले आहे. हे सरकार ‘आपले सरकार’ असल्याची भावना सर्वसामान्यांच्या मनात निर्माण करण्यात राज्य शासन यशस्वी झाले आहे असं देखील जयंत पाटील म्हणाले.