पुणे: भाजपामध्ये गेलेले पंधरा ते वीस आमदार आमच्या संपर्कात आहेत मात्र त्यांची नाव आम्ही आत्ताच उघड करणार नाही.आम्ही मेगा भरती नाही तर मेरिट भरती करणार असल्याचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज येथे सांगितले.
राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीची बैठक आज पुण्यात मोदीबाग येथे झाली या बैठकीला जाण्यापुर्वी जयंत पाटील यांनी पत्रकारांना ही माहिती दिली.तेम्हणाले राष्ट्रवादीतून भाजपामध्ये गेलेले तसेच काही अपक्ष आमदार आमच्या संपर्कात आहेत पण आम्ही त्यांची नावे आत्ताच उघड करणार नाही कारण ते त्यांच्यासाठी अडचणीचे होईल.योग्य वेळी याबाबत निर्णय जाहीर करु.
भाजपासोबत जाणार का? या प्रश्नावर बोलताना भाजपाची विचारधारा वेगळी असल्याने त्यांच्यासोबत जाणार नाही, असे पाटील म्हणाले. मग शिवसेनेसोबत कसं जाणार? या प्रश्नावर दगडापेक्षा वीट मऊ असे उत्तर त्यांनी दिले. त्याचबरोबर जनतेच्या मनातील सरकार आम्ही देणार पण स्थिर सरकार देण्याबाबत प्रयत्न सुरू आहेत. थोडासा उशीर झाला तरी चालेल पण राज्यात एक मजबूत आणि पाच वर्षे टिकणारं सरकार आलं पाहिजे यासाठी आमचे प्रयत्न सुरु असल्याचे ते यावेळी म्हणाले.
बैठकीत कोणत्या मुद्दांवर चर्चा होणार आहे हे अद्याप राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी स्पष्ट केलेले नाही,त्याचबरोबर किमान समान कार्यक्रमाचा मसुदा सुद्धा अद्याप तयार झालेला नसल्याचे ही त्यांनी स्पष्ट केले. या बैठकीला जयंत पाटील यांच्यासह माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील,अजित पवार, छगन भुजबळ,नवाब मलिक,धनंजय मुंडे, अनिल देशमुख उपस्थित होते