सांगली – करोनामुळे लोकांना लक्षात आले की देव वाचवू शकत नाही, तर डॉक्टर हाच खरा देव आहे. अशा अंधश्रद्धांपेक्षा शास्त्रावर लक्ष द्यावे. आमचा देखील रामावर तेवढाच विश्वास आहे. माझ्या मतदारसंघात सर्वात आधी राम मंदिर बांधले आहेत, असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सांगितले.
जयंत पाटील म्हणाले, धर्मापेक्षा शास्त्र महत्वाचे. करोनामुळे धार्मिक सणांना परवानगी नाही. गणपतीबाबतीत देखील मर्यादा पाळाव्या लागतील. राम मंदिर होत असेल तर आमचा विरोध नाही. पण करोनाच्या संकटात करोनाकडे लक्ष देण्याची गरज आहे. सरकारने करोनामुळे लोकांनी एकत्र येऊ नये यासाठी धार्मिक सणांना मर्यादा ठेवण्याचे आदेश दिले आहेत, असे त्यांनी अधोरेखित केले.
कॉंग्रेसवर अन्याय होत कामा नये. मुख्यमंत्री हे कॉंग्रेसशीदेखील चर्चा करत आहेत. कॉंग्रेसची नाराजी नाही. कालच आम्ही सगळे एकत्र होतो. अशोक चव्हाण नाराज नाहीत हे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले आहे. छोट्या-मोठ्या गोष्टी झाल्या तर सरकारच्या अस्तित्वावर प्रश्न निर्माण करण्याची आवश्यकता नाही, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, संजय राऊतांच्या मुलाखतीचे भाजप कौतुक कसं करणार? सरकार पडणार अशा चर्चा विरोधकांना सुरु ठेवाव्या लागतात. संख्या 105 असल्याने विरोधकांचा असा प्रयत्न आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री एकत्र भेटणं हा नित्याचा भाग आहे, असे देखील त्यांनी स्पष्ट केले.