इस्लामपूर – इस्लामपूरचे नगराध्यक्ष स्वतःच्याच प्रश्नात एवढे गुंतले आहेत की त्यांना नगरपालिकेतही लक्ष द्यायला वेळ नाही. त्यामुळे शहरातील जनतेला प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे. नागरिक अशा त्रासात कसे राहतात, हा प्रश्न आहे. लोकांच्या प्रभागनिहाय समस्या जाणून घेतल्यानंतर ही परिस्थिती समोर आल्याची माहिती जलसंपदा मंत्री व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली.
गेल्या आठवड्यात मंत्री जयंत पाटील यांनी आष्टा व इस्लामपूर शहरातील प्रत्येक प्रभागात जाऊन नागरिकांशी सुसंवाद साधला, जनतेच्या अडीअडचणी समजून घेतल्या. आष्ट्या पेक्षा इस्लामपुरात मोठया समस्या असल्याचे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले ,” इस्लामपूर शहरातील नागरिकांनी मला नेहमीच सहकार्य केले आहे. त्यामुळे लोकांना भेटणे, त्यांच्या अडीअडचणी समजून घेऊन त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणे माझे कर्तव्य आहे. लोकांना भेटल्यावर त्यांचे प्रश्न कळतात.
इस्लामपुरात डेंग्यूची साथ आहे, आरोग्याचे प्रश्न आहेत. नगराध्यक्ष नगरपालिकेत येत नाहीत. ते त्यांच्या वैयक्तिक प्रश्नांतच अडकून पडल्यामुळे त्यांना शहरातील प्रश्नांकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नसावा. अशा लोकांनी पूर्ण वेळ देणे आवश्यक आहे. परवा दीड महिन्यांनी ते पालिकेत आल्याचे समजले. शहरातील रस्त्यांचा प्रश्न गंभीर आहे.
भाजपचे सरकार असताना विकासकामांसाठी निधीच आला नाही.निधी एकतर सरकारने दिला नसावा किंवा तो निधी आणण्यात स्थानिक पदाधिकारी कमी पडले असावेत. त्यांच्या काळात जी कामे झालीत ती आधीच्या आमच्या सरकारच्या काळात मंजूर असलेलीच कामे होती, नवीन कामे आणि निधीसाठी विशेष प्रयत्न झाले नाहीत. शहरातील रस्त्यांच्या कामांसाठी पाच कोटी रुपये आम्ही मंजूर करून आणले आहेत, लवकरच कामे सुरू होतील.”