मुंबई – गोंदिया जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या भूमिकेबाबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काही आरोप केले. हे आरोप चुकीचे असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलाय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका एकला चलो रे नाही तर तीनही पक्षांनी एकत्र राहण्याची आहे, असे त्यांनी सांगितले.
आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीतील स्थानिक नेतृत्वाने एकत्र राहणे अपेक्षित आहे. गोंदिया जिल्ह्यात वेगळ्या पद्धतीने काम झाले असेल तर त्याची नोंद राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निश्चितपणे घेईल, असे जयंत पाटील म्हणाले.
परंतु मनं दुभंगलेली असल्याने गोंदिया येथे स्थानिकदृष्ट्या एकत्र येण्यासाठी काही अडचणी निर्माण झाल्या असतील, अशी शंका त्यांनी व्यक्त केली. याविषयी पक्षाचे ज्येष्ठ नेते खा. प्रफुल्ल पटेल यांच्याकडून सविस्तर माहिती घेऊ, असे ते म्हणाले.
दरम्यान, भंडारा आणि गोंदिया या दोन जिल्ह्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने काँग्रेसची साथ सोडत भाजपशी जवळीक केली. मात्र भंडारा जिल्ह्यात नाना पटोले यांनीही भाजपमधील एक गट फोडला आणि यामुळे काँग्रेसकडे परिषदेचे अध्यक्षपद आले. त्यानंतर नाना पटोले म्हणाले की, राष्ट्रवादीने अनेक ठिकाणी भाजपसोबत युती करून सत्ता स्थापन केलेली आहे. याबाबत राष्ट्रवादीच्या नेत्यांशी चर्चा देखील केली आहे. या चर्चेनंतर देखील राष्ट्रवादी काँग्रेसने स्थानिक पातळीवर भाजपशी युती केल्याचं दिसलं आहे. गोंदिया जिल्हा परिषदेत देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भाजपशीच युती केली. त्यामुळे भंडारा येथे त्यांना सत्तेपासून दूर ठेवले असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आमच्या पाठीत खंजीर खुपसला, अशा शब्दात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली होती.