आवक सुरूच असल्याने दोन दरवाजे अर्धा फूट उंचावले; २ हजार ६३७ क्यूसेक पाण्याचा विसर्ग
शेवगाव (प्रतिनिधी) : जायकवाडी जलाशयात आज शनिवारी दुपारी बाराला ९७ .७४ टक्के पाणीसाठा झाल्याने धरणाचे दोन दरवाजे अर्धा फुटाने उचलण्यात आले असुन त्यातून १ हजार ४८ क्युसेक व जलविद्युत केंद्रातुन १ हजार ५८९ क्युसेक असा एकूण २ हजार ६३७ क्यूसेक पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीपात्रात सुरु करण्यात आला आहे.
सध्या मुळा धरणाचे प्रवरा नदीतुन २ हजार क्युसेक, नांदुर मध्यमेश्वर धरणाचे गोरावरी नदीतुन २ हजार ४००.२१ क्युसेक व इतर पाण्याची आवक जायकवाडी धरणात चालू आहे. त्यामुळे आज शनिवारी दुपारी १२ वाजता जायकवाडी जलाशयात ९७.७४ टक्के पाणी साठा झाला.
जलाशयातील पाणीसाठा व येणारी आवक पाहता शनिवारी दुपारी औरंगाबाद लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे मुख्य अभियंता दिलीप तवार, अधिक्षक अभियंता राजेंद्र काळे, दगडी धरणाचे उपविभागीय अभियंता बुद्धभुषण दाभाडे, ज्ञानदेव शिरसाठ, सहाय्यक अभियंता संदिप राठोड यांच्या उपस्थितीत जलाशयाचे गेट क्रमांक १० व २७ हे अर्धा फुटाने उघडून १ हजार ४८ क्युसेक व जलविद्युत केंद्रातुन १ हजार ५८९ क्युसेक असा २ हजार ६३७ क्युसेक पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीपात्रात सुरु करण्यात आला आहे. उजवा व डावा कालव्यात सोडलेले पाणी पाहता जलाशयातुन ३ हजार २३७ क्युसेक एवढा पाण्याचा विसर्ग सुरु आहे. जलाशयात एकुण २ हजार ८६०.८ द .ल .घ .मी .पाणी साठा झाला . त्यातील २ हजार १२१.९०२ द .ल .घ.मी जिवंत पाणी साठा आहे.
यंदा सर्वत्र झालेल्या जोरदार पावसाने जायकवाडी धरणात पाण्याची आवक सुरवातीपासून बरी होती . त्यात मुळा धरण नुकतेच पुर्ण क्षमतेने भरल्यामुळे या धरणातुन नदीपात्रात सुरू केलेला पाण्याचा विसर्ग जायकवाडी जलाशयाकडे झेपावला आहे . जायकवाडी धरणात झपाट्याने होत असलेली पाण्याची वाढ लक्षात घेऊन औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी २ सप्टेंबर रोजी अप्पर जिल्हाधिकारी डॉ.अनंत गव्हाणे, निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर, औरंगाबाद लाभक्षेत्र विकासचे प्रभारी अधीक्षक अभियंता राजेंद्र काळे यांच्या समवेत झालेल्या बैठकीत जायकवाडीतून खाली नदीत पाणी सोडण्या बाबत चर्चा झाली होती. त्यानुसार धरण पाणलोट क्षेत्रात जोराचा पाऊस झाल्यास धरणात येणारी पाण्याची पाहून कोणत्याही क्षणी नदीपात्रात पाणी सुटण्याची शक्यता असल्याने धरणाखालील गावांना सतर्कतेचा इशाराही दिला होता.
आज शनिवारी दुपारी १२ ला जायकवाडी जलाशय ९७ .७४ टक्के भरले असून एकूण चार हजार ४०० .२१ क्युसेकच्या वर पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे जायकवाडीतून दोन दरवाजे अर्धा फुट उंचावून गोदावरी पात्रात २ हजार ६३७ क्यूसेक तर दोन्ही कालव्यातून ६०० क्यूसेक असे एकूण ३ हजार २३७ क्यूसेक पाणी सोडण्यात येत आहे. धरणाचे दरवाजे उघडल्याने पर्यटकाला रोखण्यासाठी धरणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.