सातारा – कॉंग्रेसचे माण-खटाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार जयकुमार गोरे यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिला. विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे त्यांनी शुक्रवारी राजीनामा सादर केला. हा राजीनामा विधानसभा अध्यक्षांनी तातडीने मंजूरही केला. यावेळी कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत उपस्थित होते.
आ. गोरे हे गेल्या काही महिन्यापासून भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. मात्र, गोरे यांच्याकडून कोणताही ठोस निर्णय जाहीर झालेला नाही. आता दि. 1 सप्टेंबर रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत राज्यातील दिग्गज नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश होणार असून या पार्श्वभूमीवर आ. गोरे यांनी शुक्रवारी राजीनामा दिला आहे. त्यामुळे तेदेखील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे निश्चित मानले जात आहे.
दरम्यान, आ. गोरे यांच्या राजीनाम्यानंतर त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीबाबत संपर्क साधला असता, उद्या, दि. 31 रोजी साताऱ्यात पत्रकार परिषद घेऊन दिशा स्पष्ट करणार असल्याचे त्यांनी सांगितले. वास्तविक आ. गोरे यांच्या भाजप प्रवेशाला माण-खटावच्या नेत्यांचा जाहीर विरोध आहे. आ. गोरे यांचा प्रवेश झाला तर सर्वपक्षीय एकत्र येऊन विरोधी उमेदवार देण्याची भूमिकादेखील भाजप नेत्यांनी घेतली आहे. या पार्श्वभूमीवर पक्षश्रेष्ठी काय भूमिका घेतात, हे पंढरपूर येथील कार्यक्रमातच स्पष्ट होणार आहे.