वडूज – राज्यात आजा विधानसभा अध्यक्ष निवडीत शिवसेना (शिंदे गट) व भाजपने बाजी मारली. त्यामुळे आता राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात माण- खटावचे भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे यांचा मंत्रिपदावरील दावा चांगलाच जड वाटू लागला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला शह देण्यासाठी मोठी व्यूहरचना आखली जात असल्याने दिल्लीतून येणाऱ्या राजकीय निरोपाकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
दुष्काळी भागातील गोरे यांना मंत्री केल्यास विकासाला मदत होईल, असे सातेवाडीच्या सरपंच सौ. वृषाली विक्रम रोमण, वडूजचे माजी सरपंच अनिल माळी, भाजप तालुकाध्यक्ष धनंजय चव्हाण, वडूज शहराधक्ष प्रदीप शेटे, प्रदीप खुडे यांनी सांगितले. आ. जयकुमार गोरे आक्रमक नेते असून आगामी जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खा. उदयनराजे भोसले, आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, शंभूराज देसाई, आ.महेश शिंदे या नेत्यांनी एकत्रित प्रचार केल्यास भाजप व शिंदेशाही सरकारच्या जिल्ह्यातील सत्ता ताब्यात येऊ शकते. त्यामुळे गोरे यांना मंत्रिपद मिळणे आवश्यक आहे.
त्यांनी पंधरा वर्षे दुष्काळी भागात पाणी आणण्यासाठी जीवाचे रान केले आहे. महत्वाकांक्षी जिहे- कटापुर योजना पूर्ण करण्यासाठी अनेकदा त्यांनी निधी मंजूर करून आणला आहे. उरमोडीचे पाणी माण- खटाव तालुक्यात आ. गोरे यांच्यामुळेच आल्याचे त्यांचे समर्थक सांगतात. सत्ता आणण्यासाठी करावा लागणारा संघर्ष गोरे यांनी अनेकदा केला आहे. आतापर्यंत दुष्काळी भागाला मंत्रिपद मिळाले नाही. आता संधी चालून आलेली आहे.
त्यामुळे आ. जयकुमार गोरे यांना मंत्री करावे, अशी मागणी होत आहे. महाविकास आघाडीत जिल्ह्यात एक सहकार मंत्री व एक गृह राज्यमंत्री, विधानपरिषद सभापती असे तीन लाल दिवे मिळाले होते. आता मंत्रिपदासाठी गोरे प्रमुख दावेदार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह वरिष्ठ नेत्यांशी गोरे यांचे चांगले संबध आहेत. त्यामुळे त्यांना मंत्रिपद मिळण्याच्या आशा पल्लवीत झाल्याचे त्यांनी सांगितले.