मुंबई – भारतीय जनता पक्षाचे तत्कालिन आमदार आणि आता खासदार असलेले उन्मेष पाटील यांनी माजी सैनिक सोनु महाजन यांना बेदम मारहाण करून त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला होता. त्या प्रकरणात फडणवीस सरकार सत्तेवर असताना या माजी सैनिकाच्या तक्रारींची कोणतीच दखल घेतली गेली नाही तसेच त्यांच्या पोलिस तक्रारीलाही वाटाण्याच्या अक्षता लावल्या गेल्या.
या प्रकरणी त्यांना उच्च न्यायालयात धाव घ्यावी लागली आहे. 2019 मध्ये खासदार पाटील यांच्यावर गुन्हा नोंदवण्याचा आदेश उच्च न्यायालयाने देऊनही अजून त्यांच्यावर का गुन्हा दाखल केला गेला नाही असा सवाल कॉंग्रेसचे प्रवक्त सचिन सावंत यांनी भाजपला विचारला आहे.
निदान इतक्या वर्षांनंतर तरी त्यांच्यावर झालेल्या हल्ल्याची संरक्षण मंत्री राजनाथसिंह हे महाजन यांना फोन करून त्यांची विचारपुस करणार आहेत काय असा सवाल सावंत यांनी उपस्थित केला आहे. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी एका माजी नौदल सैनिकाला कार्टून प्रकरणावरून मारहाण केल्याचा प्रकार झाल्यानंतर राजनाथसिंह यांनी त्यांना फोन करून त्यांची विचारपुस केली होती. मग असा फोन महाजनांना त्यांनी का केला नाही. माजी सैनिकांच्या बाबतीत हा भेदभाव का असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
सैनिकांप्रती भाजपला खराच आदर असता तर महाजन यांच्या सारख्यांना चार वर्षे न्यायासाठी भटकावे लागले नसते अशी टिप्पणीही त्यांनी केली आहे. महाविकास आघाडी सरकारकडे पाठपुरावा करून महाजन यांना न्याय देण्याचा प्रयत्न करू असेही सचिन सावंत यांनी म्हटले आहे.