पतियाळा – भारताची अव्वल महिला भालाफेक खेळाडू अन्नू राणी हिने आपलाच राष्ट्रीय विक्रम मोडला. मात्र, तरीही ती ऑलिम्पिक पात्रतेपासून दूरच राहिली.
अन्नूने तिसऱ्या प्रयत्नात 63.24 मीटर भालाफेक करताना आपलाच राष्ट्रीय विक्रम मोडला. येथील नेताजी सुभाषचंद्र बोस राष्ट्रीय क्रीडा संस्थेच्या संकुलात आजपासून फेडरेशन करंडक स्पर्धेला सुरवात झाली. पहिल्याच दिवशी अन्नूच्या राष्ट्रीय विक्रमाची नोंद झाली. पण, ती ऑलिम्पिक पात्रतेपासून दूर राहिल्याची खंत नक्कीच राहिली.
जागितक क्रमवारीत 12 व्या स्थानावर असणाऱ्या अन्नूने पहिल्या तीनही प्रयत्नात 61 मीटरहून अधिक भालाफेक केली. यातील तिसऱ्या प्रयत्नांत तिने ऑलिम्पिक पात्रतेसाठी जोरदार प्रयत्न केला. पण, तिचा भाला पात्रतेचे 64 मीटरचे अंतर कापू शकला नाही. तो 63.24 मीटरवरच रुतला. अर्थात, तिच्या कामगिरीने उत्तर प्रदेशाला पहिल्याच दिवशी तीन सुवर्णपदके मिळाली.
उत्तर प्रदेशाला दुसरे सुवर्ण सविता पाल हिने पदार्पणातच मिळवून दिले. तिने 10 हजार मीटर धावण्याची शर्यत जिंकली. तिने महाराष्ट्राचया संजिवनी जाधवला मागे टाकले. त्यानंतर तिसरे सुवर्ण किरण बालियान याने गोळाफेक प्रकारात मिळवून दिले. त्याने 16.45 मीटर गोळाफेक केली. महिलांची 100 मीटर शर्यत चर्चेची राहिली. तमिळनाडूच्या एस. धनलक्ष्मी हिने सर्वांना चकित करणारी वेळ देताना 11.38 सेकंदात आपली हिट जिंकली. तिची सहकारी अर्चना सुसींद्रन दुसरी आली.
विशेष म्हणजे ऑलिंपक पात्रतेसाठी झगडणाऱ्या हिमा दास आणि द्युती चंद अनुक्रमे 11.63 सेकंद आणि 11.51 सेकंद वेळ देऊ शकल्या. दुपारच्या सत्रात पुरुषांच्या 100 मीटर शर्यतीत पंजाबचा गुरिंदरवीर सिंग (10.30 सेकंद) सर्वात वेगवान ठरला. महिलांच्या 400 मीटर शर्यतीची अंतिम फेरी गाठताना एम. आर. पूवम्माने 54.34 सेकंद वेल दिली. महाराष्ट्राच्या ऐश्वर्या मिश्राने 55.05 सेकंद वेळ दिली.