अकोले – खडक फोडला, तर अतिशय चांगल्या प्रकारची सुपीक जमीन तयार होते आणि कल्पकता दाखवली, तर या जमिनीत सोनेही पिकू शकते, हे अकोले तालुक्यातील पश्चिम भागामध्ये दुर्गम असणाऱ्या सावरकुटे गावामध्ये अभिनव उपक्रमाद्वारे स्पष्ट झाले आहे. साडेसहा एकराच्या जमिनीला सोन्याचे मोल देणाऱ्याचे काम एका सासऱ्याने केले असून, जावयाची ही शेती म्हणून आज पथदर्शी ठरली आहे.
सावरकुटे हे राजूर या अकोले तालुक्यातील गावापासून दक्षिणेकडील डोंगर रांगांमध्ये वसलेले एक छोटेसे टुमदार गाव. या गावामध्ये सुमारे साडेसहा एकर क्षेत्रावर फुलवलेली आंबा-काजूची फळबाग पाहण्यासारखी आहे. अगदी उघड्या-बोडक्या माळरानावर अतिशय कष्टाने तयार केलेले हे नंदनवन पाहिल्यानंतर ‘वाळवंटात ओयसिस’ पाहिल्यानंतर जो आनंद होतो, तोच आनंद येथे आल्यावर होतो. उघड्या बोडक्या माळरानावर केलेली वृक्ष क्रांती आपल्याला आकर्षित करते आणि अनेक अंगांनी आपल्याला अनुभव देऊन जाते.
आयुष्याची पाऊण शतकी वाटचाल करणारे खरे तर एक चिरतरुण, सुमारे 74 वर्षे वय असलेले एक आजोबा या बागेचे निर्मितीकार आहेत. त्यांना तितकीच मोलाची साथ लाभली आहे ती त्यांच्या अर्धांगिनी प्रमिलाताई डेरे यांची. त्यांनी अपार मेहनतीने आणि कल्पकतेने तसेच निसर्गाच्या नीतिमूल्यांची जपणूक करत ही फळबाग उभी केलेली आहे. या फळबागांमध्ये सुमारे साडेसातशे आंब्याची झाडे आहेत. यामध्ये जातिवंत कलमांची लागवड करण्यात आलेली आहे. हापूस, राजापुरी, केसर, पायरी, लंगडा, दूध-पेढा, सिंधू 117, अशा विविध आंब्यांच्या वाणांची लागवड त्यांनी बागेत केली आहे.
एक तपापूर्वी सावरकुटे या छोट्याशा गावात त्यांनी आपले जावई अविनाश फटांगरे व ज्योती फटांगरे या दाम्पत्याला जमीन विकत घेऊन दिली. सुमारे 6.5 एकर जमिनीत काय लागवड करणार, हा प्रश्न जावयास पडला होता. पाणी ही मुख्य समस्या होती. तसेच जमीन पूर्ण खडकाळ आणि माळरान असल्याने या जमिनीला सुपीक बनवण्यासाठी मोठा खर्च अपेक्षित होता. जावई मुंबईत हायकोर्टात वकील असल्याने तेथून बाहेर पडणे त्यांना फारसे शक्य नव्हते. त्यामुळे स्वतः डेरे काकांनी शेतीचा पूर्ण अभ्यास करून येथे फळबाग फुलवण्याचा निर्णय घेतला. एकूणच जमीन आणि तिथले वातावरण बघता फळबाग उभी करण्याचा निर्णय एकूण गावातील लोकांनी त्यांना ठार वेडे ठरवले. परंतु डेरे काका मागे हटले नाहीत.
त्यांनी 2012 सालामध्ये 300 आंब्याचे कलम लागवड केली. कलम लागवड करण्याअगोदर उन्हाळी हंगामात डोंगर उताराच्या जमिनीवर पावसाचे पाणी अडवण्यासाठी मोठे जलशोषक चर करून घेतले. जलशोषक चरांच्या बांधांवर जेथे जमिनीच्या वरच्या थरातील चांगली माती गोळा केलेली होती, तेथे शास्त्रशुद्ध पद्धतीने आंबा फळबाग लागवड केली. या जलशोषक चरांमुळे जमिनीच्या वरच्या थरातील माती आणि पावसाचे पाणी झाडांना मुबलक प्रमाणात मिळाले. त्याचा एकंदरीत परिणाम झाडांची वाढ जोमाने होण्यावर झाला. उन्हाळ्यात पाण्याचे नियोजन करण्यासाठी त्यांनी एक लाख लिटर क्षमतेची पाण्याची टाकी शेतावर उभारली. याशिवाय दरवर्षी सेंद्रिय खते, शेणखत यांचा मोठ्या प्रमाणावर वापर करून जमिनीमध्ये जास्त काळ ओलावा कसा टिकेल, यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केलेले आहेत.