प्रियांकांना हुसकाऊन लावण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न
प्रियकांना स्थानबद्धतेतच काढावी लागली रात्र
नवी दिल्ली- सोनभद्र येथे गोळीबारात ठार झालेल्या अदिवासींच्या कुटुंबियांना भेण्यासाठी निघालेल्या कॉंग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांना तेथ अडवून तेथून हुसकाऊन लावण्याचा प्रयत्न उत्तर प्रदेश सरकारने केला असा आरोप कॉंग्रेस पक्षाने केला आहे. या गोळीबार प्रकरणात संबंधीतांवर कारवाई करण्यातही राज्य सरकारला अपयश आले असल्याचा आरोपही या पक्षाने केला आहे.
प्रियांका गांधी यांना ताब्यात घेऊन त्यांना मिर्झापुरच्या चुनार गेस्टहाऊसवर ठेवण्यात आले होते. त्यांनी कालची रात्र तेथेच काढली. मध्यरात्री या स्थानबद्धतेच्या ठिकाणी पोलिसांना पाठवण्यात आले. त्यांनी आपल्याला येथून निघून जाण्यास सांगितले असा आरोप प्रियांका गांधी यांनी केला आहे. तथापी मृत अदिवासींच्या कुटिुींबयांना भेटल्याशिवाय आपण येथून जाणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली. रात्री आपण तेथून जाण्यास तयार नसल्याचे लक्षात आल्यानंतर या गेस्ट हाऊसची वीज व पाणी बंद करण्यात आल्याचा दावाही प्रियांकांनी केला. शेवटी आज सकाळी त्यांच्या स्थानबद्धतेच्या ठिकाणी मृत अदिवासींच्या नातेवाईकांना आणण्यात आले. तेथे प्रियांकांनी त्यांची आपुलकीने विचारपूस केली.
उत्तप्रदेश सरकारने त्यांना बेकायदेशीरपणे अटक केल्याचा आरोपही कॉंग्रेसने केला आहे. राज्यात गुन्ह्यांचे प्रमाण वाढले असून राज्य सरकारला सत्तेवर राहण्याचा नैतिक आधिकार उरलेला नाही असे कॉंग्रेसने म्हटले आहे. या प्रकरणात पंतप्रधान मोदींनी का मौन पाळले आहे असाही सवाल कॉंग्रेसने उपस्थित केला आहे. प्रियांका गांधी यांच्या अटकेच्या निषेधार्थ कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी काल देशभर निदर्शने आयोजित केली होती.
सोनभद्र येथील उंभा गावाला पोलिस छावणीचे स्वरूप आले आहे. पोलिसांच्या बळावर तेथील हत्याकांडाचे सत्त्य दडपून टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे असा आरोपही कॉंग्रेसने केला आहे. प्रियांका गांधी यांना उत्तरप्रदेश सरकार इतके का घाबरते असा सवाल आज कॉंग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुर्जेवाला यांनी पत्रकार परिषदेत केला.