– हनुमंत मस्तुद
परांडा (प्रतिनिधी) : राज्यात करोनाचा फैलाव वाढतच चालला असून राज्यात काही दिवसांत करोना रुग्णांची संख्या झपाटयाने वाढत आहे. राज्यात शहराबरोबर ग्रामीण भागातही करोनाचे रूग्ण आढळून येत आहे. उस्मानाबाद जिल्हयात सध्या करोनाचे तीन रूग्ण आहे तर राज्यात रविवारी कोरोनाबाधीत ४४० नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे एकूण रुग्ण संख्या ८०६८ झाली आहे. त्याचबरोबर आतापर्यंत राज्यभरात ११८८ रुग्ण बरे झाले आहेत.
दरम्यान, करोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून उस्मानाबाद जिल्ह्यातील पंराडा तालुक्यात प्रशासनाकडून दिनांक 29 एप्रिल 2020 (बुधवार) रोजी सकाळी 7 ते रात्री 9 या वेळेत “जनता कर्फ्यू” जाहीर करण्यात आला असून हा “जनता कर्फ्यू” तालुक्यातील सर्व नागरिकांनी पाळावयाचा आहे, असे आवाहन पंराडा तालुक्याचे इन्सिडेंट कमांडर तथा उपविभागीय अधिकारी विवेक जॉन्सन यांनी केले आहे.
https://www.facebook.com/217046208635092/posts/1199113467095023/
सदर “जनता कर्फ्यू” दरम्यान दूध विक्री, मेडिकल्स, दवाखाने व शासकीय कार्यालय एवढ्याच अस्थापना सुरू राहतील. तरी सर्व परंडा तालुक्यातील नागरिकांनी सदर “जनता कर्फ्यू” चे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन विवेक जॉन्सन यांनी केले आहे.