नवी दिल्ली : भारतीय संघाचा माजी सलामीवीर गौतम गंभीरने राजकारणात प्रवेश करत ते पूर्व दिल्ली लोकसभा मतदार संघातून भाजपाच्या तिकिटावर खासदार म्हणून निवडूनही आला. खासदार म्हणून निवडून आल्यानंतर गौतम गंभीर सोशल मीडियावर केंद्र सरकारच्या धोरणांचे कौतुक करण्यास नेहमी पुढे असतो. गेल्या काही वर्षांपासून सामाजिक कार्य सुरुच ठेवले आहे. दरम्यान, आता सुद्धा त्याने असेच एक सामाजिक काम केले आहे ज्यामुळे त्याचे सर्व स्तरातून कौतूक होताना पहायला मिळत आहे.
लॉकडाउन काळातही गंभीरने आपल्या संस्थेच्या माध्यमातून अनेक मजुरांची मदत केली. यानंतर गौतम गंभीरने आणखी एक कौतुकास्पद पाऊल टाकले आहे. गंभीरने आपल्या पूर्व दिल्ली मतदार संघात अवघ्या एक रुपयांत जेवणाची सोय केली आहे. या उपक्रमाला गंभीरने जन रसोई असे नाव दिले आहे.
गौतम गंभीरने आपल्या मतदार संघातील गांधीनगर परिसरात जन रसोईच्या पहिल्या शाखेचे उद्घाटन केले आहे. 26 जानेवारी रोजी म्हणजेच प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी अशोक नगर येथे दुशऱ्या शाखेचे उद्घाटन करण्यात येणार असल्याची माहिती गौतम गंभीरच्या कार्यालयाने दिली आहे. येथील कॅंटिनची क्षमता 100 माणसांची आहे, पण करोना नियमांमुळे एका वेळी फक्त 50 लोकांनाच याचा लाभ घेता येणार आहे. जेवणात भात, मसूरची डाळ आणि भाजी असा आहार असणार आहे.
पूर्व दिल्लीतील आपल्या मतदार संघात म्हणजेच 10 विधानसभा मतदार संघात कमीत कमी एक जन रसोई उघडण्याचा गंभीरचा माणस आहे. कोणत्याही जाती, धर्म आणि पंथाच्या व्यक्तिला निरोगी आणि आरोग्यदायी जेवण मिळायलाच हवं, तो प्रत्येकाचा हक्कच आहे, असे मला वाटते. बेघर आणि निराधार लोकांना दोन वेळचं जेवणही मिळत नसल्याचे पाहून वाईट वाटते, असे गंभीर म्हणाला.