नवी दिल्ली – केंद्र सरकारच्या जनधन योजने अंतर्गत देशभरात एकूण 43 कोटी खाती काढण्यात आली असून त्या खात्यांमध्ये एकूण 1.46 लाख कोटी रुपये इतकी रक्कम ठेवण्यात आली आहे अशी माहिती अर्थमंत्रालयाने आज दिली. या योजनेला सात वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर ही माहिती देण्यात आली आहे. पंतप्रधान मोदींनी 2014 साली आपल्या स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात या योजनेची घोषणा केली होती. त्यानुसार 28 ऑगस्ट रोजी त्या योजनेची सुरवात करण्यात आली.
या योजनेच्या सध्याच्या स्थितीनुसार देशभरात एकूण 43 कोटी 4 लाख खाती सुरू झाली असून त्यातील 55.47 टक्के खाती महिलांच्या नावावर आहेत. या एकूण खात्यांपैकी 85 टक्के खाती सध्या वापरात आहेत आणि सुमारे पंधरा टक्के खाती बंद पडली आहेत. या खात्यांवर एकूण 31 कोटी 23 लाख रूपे कार्ड जारी करण्यात आली आहेत.
या रूपे कार्डावर दोन लाख रुपयांचा ऍक्सिडेंट विमा दिला जातो. देशातील सामान्य जनतेच्या आर्थिक समावेशाकरता ही योजना महत्त्वाची ठरली आहे आणि देशातील सर्वांपर्यंत बॅकिंग व्यवस्था पोचण्याचा योजनेचा उद्देश साध्य झाला आहे असे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे. सरकारने कोविड काळात या खात्यांवर 30 हजार 945 कोटी रूपयांची मदत पोहचवली आहे. तसेच या खातेदारांना डीबीटी योजनेद्वारे सरकारी निधी थेट स्वरूपात पोहचवला जात आहे.