जम्मू – श्रीनगर मध्ये किंवा दक्षिण काश्मीर मध्ये पंडितांच्या मालकीच्या ज्या सफरचंदे आणि अन्य फळांच्या बागा आहेत त्यांची अलिकडेच मोठ्या प्रमाणात नासधुस करण्यात आली आहे. त्या प्रकाराबद्दल काश्मीरी पंडितांनी आज येथे उग्र निदर्शने केली. काश्मीरातील अल्पसंख्य असलेल्या पंडित समुदायाच्या मनात दहशतीचे आणि भीतीचे वातावरण निर्माण करण्यासाठीच हा प्रकार केला गेला आहे असे त्यांनी म्हटले आहे.
ज्यांच्या बागांचे असे नुकसान झाले आहे अशांनी यावेळी आपले अनुभव कथन केले. हा प्रकार करणाऱ्यांना त्वरीत अटक करण्यात यावी अशी मागणी ऑल स्टेट काश्मीरी पंडित कॉन्फरन्सने केली आहे. या प्रकरणाची चौकशी करून ज्यांच्या फळबागांचे नुकसान झाले आहे त्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी ऑल पार्टी मायग्रंट कोऑर्डिनेशन कमिटीचे अध्यक्ष विनोद पंडिता यांनी यावेळी केली.