प्रवेशबंदीचा आदेश राज्यपालांकडून रद्द
श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधून अमरनाथ यात्रेकरू आणि पर्यटकांना माघारी पाठविण्याबाबत गृह विभागाने जारी केलेला 2 ऑगस्टचा आदेश जम्मू-काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी मागे घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी येत्या 10 ऑक्टोबरपासून होणार आहे. त्यामुळे पर्यटकांसाठी काश्मीरचे नंदनवन पुन्हा खुले होणार असल्याने पर्यटकांना दिवाळीच्या सुट्ट्या इथे एंजॉय करू शकणार आहेत.
जम्मू-काश्मीरचे राज्यपाल मलिक यांनी घेतलेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे कलम 370 रद्द करण्यात आल्यानंतर आता प्रथमच पर्यटकांना जम्मू-काश्मीरमध्ये जाता येणार आहे. जम्मू-काश्मीरमधील स्थिती पूर्ववत करण्याच्या दृष्टीने हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय आहे. जम्मू-काश्मीरमध्ये ब्लॉक विकास बोर्डाच्या निवडणुका घेण्याची घोषणा गेल्याच आठवड्यात करण्यात आली होती. त्यानंतर तेथे पर्यटकांना प्रवेश देण्याचा हा निर्णय घेण्यात आला आहे.