श्रीनगर – जम्मू-काश्मीरमध्ये संचारबंदी लागू होऊन आज १२ दिवस झाले. परंतु, अनेक पक्षांचे नेते अद्यापही नजरकैदेत आहेत. यामध्ये जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती आणि नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे अध्यक्ष ओमर अब्दुल्ला या दोघांचाही समावेश आहे. अशातच मेहबुबा मुफ्ती यांची मुलगी इल्तिजा जावेद हिने एक व्हॉइस मॅसेज जारी केला आहे. यामध्ये इल्तिजाने म्हंटले कि, आम्हाला ताब्यात घेण्यात आले असून माध्यमांसोबत संवाद साधल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी देण्यात आली आहे. याबाबत तिने गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहीत स्पष्टीकरणही मागितले आहे.
संपूर्ण देश गुरुवारी भारताचा स्वातंत्र्य दिवस साजरा करत होता आणि काश्मिरी लोकांना जनावरांप्रमाणे बंद केले जात आहे. त्यांना मूलभूत मानवाधिकारांपासून वंचित ठेवण्यात येत आहे, असे इल्तिजा जावेदने पत्रात लिहले आहे.
इल्तिजाने व्हॉइस मॅसेज म्हंटले कि, मलाही ताब्यात घेण्यात आले आहे. कारण भयानक कर्फ्यू लावल्यानंतर काश्मिरी लोकांना कोणत्या परिस्थितीला सामोरे जावे लागत असल्याचे मी माध्यमांना सांगितले होते. यानंतर पुन्हा माध्यमांसोबत संवाद साधल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी देण्यात आली आहे. माझ्यासोबत एखाद्या आरोपींसारखा व्यवहार केला जात आहे. आणि माझ्यावर सातत्याने नजर ठेवण्यात येत आहे. एवढेच नव्हेतर ज्या काश्मिरींनी याविरोधात आवाज उठवला त्यांच्यासोबत मलाही जीवाला धोका असल्याचे वाटत आहे.
दरम्यान, जम्मू-काश्मीरमधील कलम 370 रद्द करण्यात आले आहे. यानंतर सरकारने तेथे घातलेले निर्बंध आणि अन्य खबरदारीच्या उपाय योजनांविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी करण्यास नकार दिला.