मोहरीच्या उद्भवात आठ दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा
जामखेड – पावसाने ताणल्याने ऑगस्ट महिन्यातही जामखेडकरांना टॅंकरच्या पाण्यावरच अवलंबून रहावे लागत आहे. सध्या 57 टॅंकरद्वारे जामखेड शहरासह गाव व वाड्या वस्त्यांवर पाणीपुरवठा केला जात आहे. परंतु आता ज्या उद्भवातून टॅंकर भरण्यात येत आहेत. त्या मोहरी येथील उद्भवात केवळ आठ दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा राहिल्याने चालू असलेले टॅंकर देखील आता बंद करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. खेपाच पुर्ण होणार नसतील तर टॅंकर बंद करावे लागणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
दरम्यान, प्रशासनापुढे टॅंकर कोठे भरावे, असा प्रश्न असतांना टॅंकर संस्थेकडून मात्र तीन महिन्याचे एकदम बिल देवून दडपशाही केली जात आहे. अर्थात दरमहिन्याच्या 5 तारखेला बिल प्रशासनाला देणे अपेक्षित आहे. टॅंकर चालू करतांना करण्यात आलेल्या करारनाम्यात तसा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे. परंतु जामखेडला टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करणाऱ्या वीट उत्पादक संस्थेकडून तब्बल तीन महिन्याचे एकदमच बिल प्रशासनाला देण्यात आले आहे. सत्ताधारी भाजपचा पदाधिकारी या संस्थेचा संचालक आहे. त्यामुळे सत्तेचा गैरवापर होणे सहाजिकच आहे.
या संस्थेला जानेवारी ते एप्रिल या चार महिन्याचे 3 कोटी 57 लाख 69 हजार 198 रुपये बिल देण्यात आले आहे. दरमहिन्याला बिल देणे बंधनकारक असतांना या संस्थेकडून मनमानी पद्धतीने कामकाज केले आहे. अर्थात बिल देण्याची पद्धत पाहिल्यानंतर तालुक्यात टॅंकरद्वारे पाणीवाटप करतांना किती संस्था कशा पद्धतीने कामकाज करीत असले हे आता वेगळे सांगायला नको. नियम धाब्यावर बसून संस्थेकडून टॅंकरद्वारे पाणी वाटप करण्यात येत आहे.
संस्थेकडून मनमानी सुरू असतांना प्रशासन मात्र आठ दिवसांनी टॅंकर कोठे भरावेत या काळजी आहे.
प्रशासनाला पाण्याचे पडले असतांना संस्थेला पैशाचे पडले आहे. अर्थात अनुदान उपलब्ध झाल्याशिवाय बिल अदा करता येणार नाही असे स्पष्ट करण्यात आले असतांनाही या संस्थेकडून पालकमंत्र्यांच्या नावाचा वापर करून प्रशासनाला वेठीस धरले जात आहे. मोहरी येथील उद्भवात आठ दिवस पुरेल एवढेच पाणी आहे. त्यामुळे येत्या आठ दिवसात जामखेड शहरासह वाडया वस्त्यांना करण्यात येणारा टॅंकरद्वारे पाणीपुरवठा बंद होण्याची शक्यता आहे. सध्या तरी खेपा पूर्ण होत नसल्याने हळूहळू एक-एक टॅंकर बंद करण्यात येणार आहे.
पावसाने ओढ दिल्याने जामखेडचा पाणीप्रश्न गंभीर झाला आहे.
त्यात आता उद्भवच कोरडा पडल्यानंतर टॅंकर भरण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. कर्जत तालुक्यातील मांदळी येथून टॅंकर भरण्याचा प्रस्ताव आहे. सध्या या उद्भवावर श्रीगोंदा व कर्जत तालुक्यातील टॅंकर भरण्यात येत आहे. तेथून टॅंकर भरणे जामखेडच्या दृष्टीने अडचणीचे तसेच अंतर लांबणारे आहे. त्यामुळे जामखेडकरांसाठी पिण्याच्या पाण्याचे टॅंकर कोठे भरावेत. असा प्रश्न सध्या भेडसावत आहे.