जामखेड : महाराष्ट्र शासनाच्या सातत्याने दूर्लक्षामुळे व नगरपालिका प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे राज्यातील नगरपरिषदेच्या कर्मचार्यांच्या अनेक प्रमुख मागण्या शासनाकडे अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. त्या मागण्या पूर्ण न झाल्यामुळे नगरपालिका, नगरपरिषद, नगर पंचायत, कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने 29 ऑगस्ट रोजी कामकाज बंद आंदोलन केले आहे.
केंद्र सरकारच्या धरतीवर राज्य सरकारने ही राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना UPS योजना लागू करण्याबाबत घोषणा केलेली असल्यामुळे राज्यातील बहुसंख्य कर्मचारी/अधिकारी संघटनांनी कामबंद आंदोलन स्थगित केलेले आहे. परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असलेल्या नगर विकास विभागातील महाराष्ट्र राज्य नगर परिषद संवर्ग अधिकार्यांना शासनाच्या अधिनियमानुसार राज्य शासकीय कर्मचारी म्हणून दर्जा दिलेला आहे. त्यास नगर विकास विभागाने सुद्धा दुजोरा दिलेला आहे व त्यानुसार सदर अधिकाऱ्यांना सेवार्थ आयडी देणे बाबतचा प्रस्ताव वित्त विभागाकडे गेला असता वित्त विभागाने सदर अधिकारी शासकीय कर्मचारी नसल्याबाबतची तृटी काढून राज्यातील अंदाजे 3000 संवर्ग अधिकार्यांना सेवार्थ आयडी पासून वंचित ठेवले.
सदर अधिकाऱ्यांपैकी बरेच अधिकारी 2010-2012 पासून कार्यरत असून अद्याप पर्यंत त्यांना जुनी पेन्शन/ नवी पेन्शन यापैकी कुठल्याही पेन्शन योजनेची अंमलबजावणी झालेली नाही. याच सोबत नगरपरिषदचे स्थानिक कर्मचारी यांना सुद्धा पेन्शन लागू नाही. यामुळे या सर्व अधिकाऱ्यांच्या कुटुंबांचे भवितव्य अंधकारात असल्यामुळे महाराष्ट्र राज्य नगर परिषद संवर्ग अधिकारी संघटनेने आपले काम बंद आंदोलन स्थगित न करता सेवार्थसह पेन्शन योजनेचे पर्याय दिल्याशिवाय बेमुदत काम बंद आंदोलन मागे घेतले जाणार नाही असे ठरवलेले आहे.
त्यानुसार आज जामखेड नगरपरिषद कार्यालयतील सर्व संवर्ग व नगरपरिषद कर्मचारी यांनी 100% काम बंद आंदोलन सुरू केले आहे.यावेळी कार्यालय अधीक्षक संभाजी कोकाटे, लेखापाल महेश कवादे, पाणीपुरवठा अभियंता ज्ञानेश्वर मिसाळ, विद्युत अभियंता आकाश सानप, आस्थापना विभाग प्रमुख मंगेश घोडेकर, बांधकाम अभियंता आमेर शेख, लक्ष्मण माने भांडार विभाग, अभिजित भैसडे जन्म मृत्यू विभाग, प्रमोद टेकाळे आस्थापना विभाग, रज्जाक शेख लेखा विभाग, प्रणित सदाफुले पाणीपुरवठा विभाग, राजू काझी दाखले उतारे विभाग, संजू खेत्रे, कृष्णा विर वसुली विभाग, संजीवन जाधव, इतर जामखेड नगरपरिषद अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.