जामखेड(प्रतिनिधी) : तालुक्यातील डोणगाव येथे इयत्ता बारावीमध्ये असलेल्या अल्पवयीन विद्यार्थीनीचा मृतदेह विहीरीत तरंगताना आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. सदर मुलगी तीन दिवसांपासून बेपत्ता होती. याबाबत जामखेड पोलिस ठाण्यात नातेवाईकांनी मिसिंग दाखल केली होती. या प्रकरणी एका संशयितास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, तालुक्यातील रत्नापूर येथील अल्पवयीन मुलगी डोणगाव येथे आजी-आजोबाकडे आली होती. ही मुलगी गुरुवार दि. 18 रोजी सायंकाळ पासुन बेपत्ता होती. त्यामुळे नातेवाईकांनी रात्रभर तीचा शोध घेतला, पण ती सापडुन न आल्याने मुलीच्या आजोबांनी शुक्रवार दि. 19 रोजी जामखेड पोलिस ठाण्यात मुलगी हरवल्याची तक्रार दाखल केली होती. या नंतर तिसर्या दिवशी शनिवार दि. 20 रोजी सदर मुलीचा शोध घेत आसताना नातेवाईकांना तिचा मृतदेह सकाळी साडेदहा वाजता डोणगाव येथील तिच्या घरापासून अर्ध्या किलोमीटर अंतरावरील किन्हीचा ओढा येथील विहीरीत तरंगताना आढळून आला. यानंतर डोणगावचे पोलीस पाटील बिभीषण यादव यांनी सदरची घटना जामखेड पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील यांना कळवली.
त्यानंतर पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील, सपोनि. अवतारसिंग चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक संजय बोकील, पो. कॉ. शिवाजी भोस, बाजीराव सानप, गणेश साने, अजय साठे, विष्णू चव्हाण, शेषराव म्हस्के यांच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली. यानंतर ग्रामस्थांच्या मदतीने सदरचा मृतदेह विहिरीच्या बाहेर काढण्यात आला व शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केला. वैद्यकीय अधिकारी डॉ. युवराज खराडे यांनी शवविच्छेदन केले. या प्रकरणी मुलीच्या वडीलांनी दिलेल्या खबरीवरून जामखेड पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यू रजिस्टरला नोंद केली आहे.