महानगरपालिका प्रशासनाकडून प्रस्ताव तीन वर्षांपासून दुर्लक्षित
संतोष कचरे
आंबेगाव बुद्रुक – आंबेगाव खुर्द परिसरातील जांभूळवाडी तलाव परिसराचा समावेश महानगरपालिकेत करण्यात यावा तसेच येथे पर्यटनस्थळ निर्माण करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली असली तरी याबाबतचा प्रस्ताव गेल्या तीन वर्षांपासून लालफितीत अडकला आहे. हा प्रस्ताव मार्गी लागला तर विकासाला मोठ्या प्रमाणात चालना मिळेल. याबाबत पालिका प्रशासनाने लक्ष घालावे, असे नगरसेवक युवराज बेलदरे यांनी सांगितले.
आंबेगाव खुर्द परिसरासाठी जांभूळवाडी तलाव हा प्रकल्प नेहमीच महत्त्वाचा आणि अभिमानास्पद ठरत आला आहे. आंबेगाव खुर्द व जांभूळवाडी पाझर तलावाची निर्मिती रोजगार हमी योजनेंतर्गत करण्यात आली असून साधारणत: 95 आर क्षेत्रात सदर तलाव पसरलेला आहे. शेतीसाठी व पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी सोय व्हावी, या उद्देशाने या तलावाची निर्मिती करण्यात आली आहे.
पावसाळ्यात जांभूळवाडी तलावाचा परिसर खुलून येतो. सध्याही तलाव पूर्ण क्षमतेने भरला आहे. सांडव्यातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे. तलावाशेजारी असणारा हिरवागार डोंगर पर्यटकांना खुणावत आहे. याच कारणातून गेल्या काही वर्षात या तलावावर पर्यटकांची गर्दी होत आहे.
करोनामुळे यावर्षी पर्यटनास बंदी असल्याने गर्दी काहीशी कमी असली तरी या तलाव परिसराचा विकास पर्यटनस्थळ म्हणून केल्यास येथील उद्योगही भरभराटीस येतील, यातून या परिसराचा विकास होऊ शकतो. याच कारणातून पर्यटनस्थळाबाबतचा प्रस्ताव तीन वर्षांपूर्वीच महानगरपालिकेसमोर ठेवला आहे. यानुसार येथील तलाव परिसर विकसती करण्यात यावा, अशी मागणीही करण्यात आली असल्याचे नगरसेवक बेलदरे यांनी सांगितले.
आंबेगाव खुर्द जांभूळवाडी परिसराचा समावेश तीन वर्षांपूर्वीच महानगरपालिकेत झाला असला तरी तलाव परिसर पालिकेच्या ताब्यात देण्यात आलेला नाही. याबाबत आम्ही वारंवार मागणी करीत आहोत. पालिकेने याकडे लक्ष दिले तर तलावाचा परिसर पर्यटनस्थळ म्हणून विकसित करता येईल. यातून नवनवीन उद्योगांना चालना मिळेल.
– युवराज बेलदरे, नगरसेवक, पुणे महानगरपालिका