जळगाव – आजीसोबत शेतात गेलेल्या दोन चिमुकल्या बहिण भावाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना जामनेर तालुक्यातील जांभोळ येथे घडली असून या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
गोरख एकनाथ वायखर यांचा सहा वर्षीय मुलगा रुद्र व नितिन एकनाथ वायखर यांची सात वर्षीय मुलगी पायल यांचा शेताला लागून असलेल्या कट्यात बुडून मृत्यु झाल्याची दुर्दैवी घटना घडली.
या घटनेबाबत सविस्तर वृत्त असे की, दोन मुले आपल्या आजीसोबत शेतात गेली होती. आजी कामात व्यस्त असतांना या दोघा भावंडांनी शेताला लागून असलेल्या केटीवेअरमध्ये असलेले पाणी पाहण्यासाठी उतरले. पाण्याचा अंदाज न आल्याने ते पाण्यात बुडाले.
घटनेची माहिती मिळताच गावातील नागरिकांनी शेतात धाव घेत या भावडांना पाण्यातून बाहेर काढले. अगोदर मुलाला बाहेर काढण्यात यश आले; त्यावेळी मुलाचा श्वास सुरु होता. त्यानंतर मुलीचा मृतदेहच बाहेर काढला. मुलाला दवाखान्यात नेत असतांना वाकोदपर्यंत आल्यावर निधन झाले. चिमुकल्या पायल आणि रुद्रचे मृतदेह पाहून आई- वडिलांनी एकच हंबरडा फोडला.