जळगाव : जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची निवडणूक चुरशीची होणार अशी चर्चा काही दिवसांपूर्वी होती. मात्र या निवडणुकीत नवीन ट्विस्ट आला असून भाजपने या निवडणुकीतून माघार घेतली आहे. त्यामुळे जिल्हा मध्यवर्ती बँकेवर महाविकास आघाडीचं वर्चस्व असणार आहे.
भाजपच्या सर्वच उमेदवारांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघारीचा सोमवारी शेवटचा दिवस होता. 21 जागांसाठी एकूण 149 उमेदवारी अर्ज होते. मात्र माघारीच्या अखेरच्या दिवशी माजी मंत्री गिरीश महाजन, आमदार सुरेश भोळे, माजी आमदार स्मिता वाघ, माजी खासदार ए.टी.पाटील यांच्यासह सर्वच उमेदवारांनी माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे.
याआधी उमेदवारी अर्ज छाननीमध्ये भाजप खासदार रक्षा खडसे यांचा उमेदवारी अर्ज त्रुटींमुळे बाद झाला होता. त्यामुळे रोहिणी खडसे विरूद्ध खासदार रक्षा खडसे यांच्यातील लढत होण्याची शक्यता मावळली होती. रक्षा खडसे यांच्यासह माजी आमदार संतोश चौधरी यांचाही अर्ज बाद झाला होता.
दरम्यान जिल्हा बँक शेतकऱ्यांची बँक असून याठिकाणी शेतकऱ्यांना प्रतिनिधीत्व मिळावे यासाठी ही माघार घेण्यात येत असल्याचे भाजपचे जिल्हाध्यक्ष सुरेश भोळे यांनी सांगितले.