मुंबई – मुंबई महापालिकेची निवडणूक २०२२ रोजी होणार आहे. मात्र, आतापासूनच सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. सत्ताधारी शिवसेनेनेही जोरदार तयारी सुरु आहे. ‘मुंबई मा जलेबी ना फाफडा, उद्धव ठाकरे आपडा’ असे म्हणत शिवसेनेने पुन्हा एकदा गुजराती बांधवांना साद घातली आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेने अमराठी बांधवांकडेही लक्ष केंद्रित केले आहे. यानुसार, गुजराती मतदारांना आकर्षित करण्यासाठी ‘मुंबई मा जलेबी ना फाफडा, उद्धव ठाकरे आपडा’ या मथळ्याखाली शिवसेनेचा मेळावा होणार आहे. १० तारखेला मुंबईतील जोगेश्वरी भागात मेळावा आयोजित केला आहे. यावेळी १०० गुजराती बांधव शिवसेनेत प्रवेश करतील असेही समजत आहे.
शिवसेना संघटक हेमराज शाह यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यासाठी गुजराती आणि मराठी भाषेत निमंत्रण पत्रके प्रसिद्ध करण्यात आली आहे.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीतही वरळी मतदारसंघातून आदित्य ठाकरे निवडणुकीला उभे राहिले होते. त्यावेळी ‘केम छो वरळी’ असे म्हणत गुजराती बांधवांना साद घातली होती.