काठमांडू – परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी आज नेपाळच्या अध्यक्षा बिद्या देवी भंडारी यांची भेट घेतली. नेपाळचे राजभवन शीतल निवास इथे ही भेट झाली, असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. जयशंकर दोन दिवसांच्या नेपाळ दौऱ्यासाठी आज येथे दाखल झाले आहेत.
आज त्यांनी नेपाळचे पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांचीही भेट घेतली. त्यांच्याबरोबरच्या चर्चेमध्ये द्विपक्षीय संबंधांचा आढावा घेण्यात आला. या चर्चेमध्ये संलग्नता आणि व्यापार, परिवहन, उर्जा, जलस्रोत, संस्कृती आणि शिक्षण क्षेत्रातील भागीदारीच्या विविध मुद्दयांवर भर देण्यात आला.
काठमांडू इथे झालेल्या पाचव्या “जॉईंट कमिशन’च्या बैठकीलाही जयशंकर उपस्थित राहिले. भारत आणि नेपाळदरम्यान 1987 मध्ये हे “जॉईंट कमिशन’स्थापन करण्यात आले आहे. द्विपक्षीय भागीदारीच्या संधींचा आढावा या कमिशनच्यावतीने दरवर्षी घेतला जातो. नेपाळमधील नोवाकोत आणि गोरखा जिल्ह्यांमध्ये भारताच्यावतीने बांधण्यात येणाऱ्या घरांच्या बांधकामांसाठी 2.45 अब्ज नेपाळी रुपयांचा धनादेशही जयशंकर यांनी नेपाळच्या अधिकाऱ्यांच्या स्वाधीन केला.
अन्न सुरक्षा आणि निकष निश्चितीच्या अधिकृततेसंदर्भात एक सामंजस्य करारही यावेळी करण्यात आला.9