नवी दिल्ली – पंडित नेहरू यांच्या काळातील देशातील एक महत्वाचे राजकारणी व्ही के कृष्ण मेनन याचे चरित्र लिहीण्याच्या कामात सध्या माजी केंद्रीय मंत्री जयराम रमेश हे व्यस्त आहेत. पुढील वर्षाच्या सुरूवातीला त्यांचे हे पुस्तक पेंग्वीन प्रकाशन संस्थेकडून बाजारात आणले जाणार आहे. चीन युद्धाच्या काळात ते देशाचे संरक्षण मंत्री होते. त्यावेळच्या त्यांच्या भूमिकेविषयी मोठाच प्रवाद आहे.
1947 ते 74 या काळात ते प्रशासकीय क्षेत्रात कार्यरत होते. त्यांची नेहरूंशी विशेष जवळीक होती. चीन युद्धानंतर 1962 मध्ये त्यांना संरक्षण मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. या चरित्रात्मक पुस्तकात आपण त्यांच्या व्यक्तीमत्वाच्या अनेक महत्वाच्या पैलुंवर प्रकाश टाकणार आहोत असे रमेश यांनी म्हटले आहे. त्यांच्या संबंधात केवळ भारतातच नव्हे तर अमेरिका, ब्रिटन, रशिया, चीन या देशांमध्ये उपलब्ध असलेली माहिती मिळवण्याचा आपला प्रयत्न आहे असेही रमेश यांनी सांगितले. त्यांच्या काळातील घडामोडींना आजच्या सदंर्भात खूप महत्व असल्यानेच आपण त्यांचे पुर्ण चरित्रात्मक पुस्तक लिहीण्याचे काम हाती घेतले आहे असे रमेश यांनी म्हटले आहे. मेनन हे स्वता पेंग्विन या प्रकाशन संस्थेचे संस्थापक संपादक होते.